Sri Rama, the best king of Ikshvaku dynasty esakal
सप्तरंग

राजवंश भारती : इक्ष्वाकू राजवंश (सूर्यवंश)

भारताच्या इतिहासातील असा प्रागैतिहासिक कालखंड मौखिक परंपरेने वेद आणि पुराणे यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे.

सकाळ डिजिटल टीम

लेखक : ॲड. सुशील अत्रे

जो इतिहास आपल्याला परिचित आहे, त्याच्याही आधी काहीतरी घडून गेलेले असतेच. त्या कालखंडाला म्हणतात ‘प्रागैतिहासिक’. तो इतिहासच असतो; पण त्याचे दृश्‍य, भौतिक पुरावे समोर नसतात.

भारताच्या इतिहासातील असा प्रागैतिहासिक कालखंड मौखिक परंपरेने वेद आणि पुराणे यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. पण, त्याला काल्पनिक म्हणायचे आणि सोडून द्यायचे, ही शिकवण आपल्याच देशातल्या ठराविक विद्वानांनी दिली आणि ती आपण शिरसावंद्य मानली.

त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याआधी जणू भारताला इतिहासच नव्हता, अशा समजुतीत आम्ही वावरलो. पुराण कथांमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींना ‘काल्पनिक पात्रे’ मानण्याची आत्मघातकी सवय आपल्या मुलांना आपण खुशाल लागू करू दिली.

ती वस्तुस्थिती नाही. जरा डोळ्यांवरची झापडे बाजूला करून चिकित्सक वृत्तीने पाहू. (saptarang latest marathi article by sushil atre on rajvansh bharti Ikshvaku Dynasty suryavanshi khandesh nashik)

जगाच्या पाठीवर होऊन गेलेल्या सर्वच प्राचीन संस्कृतींच्या आपापल्या पुराण कथा आहेत. त्यात ‘महाप्रलय’ ही एक कथा प्रत्येक संस्कृतीत आढळतेच, हा केवळ योगायोग नव्हे. ती एक सर्वज्ञात घटना होती, हाच त्याचा अर्थ आहे.

आपल्या पुराणांनुसार हा महाप्रलय येऊन गेला आणि त्यानंतर नवे जग वसले. ही जगबुडीची घटना सुमारे १५/१६ हजार वर्षांपूर्वी घडली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे.

त्या काळी जो नेता होता- राजा होता त्यालाच ‘वैवस्वत मनू’ म्हटले आहे. विवस्वानाचा- सूर्याचा- मुलगा म्हणून वैवस्वत! एका अर्थी प्रलयोत्तर नव्या जगाचा आदिपुरुष.

या मनूला दहा मुलगे व मुलगी होती. त्यातील एकाचे नाव इक्ष्वाकू. तो अत्यंत पराक्रमी व दक्ष राजा होता. त्याच्या नावे त्याचा वंश ओळखला गेला, इक्ष्वाकू वंश. तो ‘सूर्या’चा वंशज म्हणून इक्ष्वाकू वंशाला ‘सूर्यवंश’ही म्हणतात.

या राजवंशाची राजधानी होती अयोध्या. ती स्वत: मनूनेच वसवली म्हणतात. असे म्हणायला हरकत नाही, की भारतातील सगळ्यात प्राचीन- बहुधा आद्य राजवंश म्हणजे इक्ष्वाकू वंश. सगळ्यात प्राचीन वाङ्‍मयात- ऋग्वेदात दहाव्या मंडलात इक्ष्वाकू कुळाचा उल्लेख आहे.

एखाद्या वंशात कोणी प्रचंड कर्तृत्ववान राजा होऊन गेला की तो वंश पर्यायवाचक म्हणून त्याच्याही नावे ओळखला जातो. तसेच, इक्ष्वाकू वंशात पुढे ककुस्थ आणि रघू हे चक्रवर्ती सम्राट होऊन गेले.

त्यांच्या नावावरून हेच कूळ ‘काकुस्थ’ आणि ‘रघूकुल’ म्हणून प्रसिद्ध झाले. या वंशातील सगळ्यात प्रसिद्ध आणि देवस्वरूप राजा म्हणजे अर्थात राजा रामचंद्र, प्रभू श्रीराम. रामरक्षेत रामाचा उल्लेख ‘काकुस्थ’ आणि ‘रघुकुलतिलकम्’, ‘रघुवंशनाथम्’ असा येतो.

याशिवाय, रामाच्या पूर्वी होऊन गेलेले इक्ष्वाकू वंशातील प्रसिद्ध राजे कोणते ते पाहा- ज्याच्या नावावरून या धरतीला ‘पृथ्वी’ म्हणू लागले तो राजा पृथू, आद्य चक्रवर्ती सम्राट मांधाता, ऋग्वेदात उल्लेख असलेल्या दाशराज्ञ युद्धाचा नायक राजा सुदास, दुर्वास मुनींचे गर्वहरण करणारा भक्तराज अंबरीष, आदर्श सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, ज्याच्या नावाने समुद्राला ‘सागर’ नाव मिळाले तो राजा सगर, त्याचाच पणतू भगीरथ; ज्याने अफाट प्रयत्नांनी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली, तसेच ज्याने प्रत्यक्ष कुबेरावर, स्वर्गावर स्वारी करण्याची तयारी केली होती आणि ज्याच्या नावावरून महाकवी कालिदासाने ‘रघुवंश’ महाकाव्य रचले, तो पराक्रमी राजा रघू, त्याचा नातू राजा दशरथ, त्याचे चारही दिगंतकीर्ती पुत्र- राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सगळेच इक्ष्वाकू वंशातील राजे आहेत.

एवढेच नव्हे, तर जैन पुराणांमध्ये असा एक मतप्रवाह आहे, की इक्ष्वाकू वंशातच पहिले तीर्थंकर श्री ऋषभदेव आणि इतरही अनेक तीर्थंकर जन्मले. तसेच, बौद्ध ग्रंथानुसार बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थ हा शाक्य राजकुमारही सूर्यवंशात जन्माला आला होता.

लव-कुशांनंतर या वंशात जे राजे होऊन गेले, त्यातील ५० व्या पिढीतील राजा म्हणजे ‘बृहद्बल’. हा बृहद्बल महाभारत युद्धात कौरवांकडून लढला आणि अभिमन्यूच्या हाती मारला गेला. याचा अर्थ रामायण ते महाभारत यात सुमारे ५० पिढ्यांचे अंतर आहे.

महाभारत युद्धानंतर राज्यांची समीकरणे पूर्ण बदलली. सारा भारत, सम्राट युधिष्ठिराच्या अधिपत्याखाली आला. कालांतराने उत्तर सूर्यवंश राजा बृहद्क्षण याच्यापासून पुढे सरकला.

सुमारे २७ पिढ्या गेल्यावर, राजा सुमित्र हा कोसलनरेश असताना मगधवंशीय महापद्म नंदाने त्याचा पराभव केला. हा काळ मौर्य साम्राज्य स्थापनेच्या काही वर्षे आधीचा आहे. इथून पुढे ज्ञात इतिहासाचा धागा जुळतो.

इक्ष्वाकू सूर्यवंशात साधारणत: ११७ राजे असे होऊन गेले, ज्यांच्या नावाचा संदर्भ पुराणांमध्ये किंवा महाकाव्यांमध्ये सापडतो.

काही असेही असतील, जे नगण्य असल्याने त्यांचा स्वतंत्र उल्लेख नाही. ते विचारात घेता इक्ष्वाकू वंशाचे सुमारे सव्वाशे राजे आणि शंभरावर पिढ्या भारताच्या इतिहासात वावरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT