Narayanpal Vishnumandir
Narayanpal Vishnumandir Sakal
सप्तरंग

बस्तरची शान नारायणपाल विष्णुमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

बस्तर. छत्तीसगढ राज्याचा एक मोठा भाग. केरळ राज्यापेक्षाही आकाराने मोठा असलेला हा भाग. बस्तर म्हटले की आपल्या नजरेसमोर येते तिथले घनदाट जंगल, त्यात राहणारे आदिवासी, तिथले निखळ निसर्गसौंदर्य आणि या साऱ्याला गालबोट लावणारी नृशंस नक्षलवादी हिंसा. पण याच बस्तरमध्ये अनेक सुंदर, प्राचीन मंदिरे आहेत हे किती जणांना ठाऊक आहे?

बस्तर हे १९४७ पूर्वी एक संस्थान होते. बस्तरचे प्राचीन नाव चक्रकोट. इथल्या सध्याच्या राजघराण्याचा मूळ पुरुष आनमदेव हा वारंगलच्या काकतीय राजघराण्यातला धाकटा राजपुत्र मानला जातो. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने चौदाव्या शतकात दक्षिण भारतावर स्वारी केली तेव्हा त्याने वारंगल लुटले व तिथल्या मंदिरांचा विध्वंस केला. तिथला राजा रुद्रप्रताप देव लढाईत मारला गेला पण त्यापूर्वी त्याने आपल्या धाकट्या भावाला, म्हणजे अनामदेवाला त्याचा जीव वाचवण्यासाठी काही विश्वासू सहकाऱ्यांसोबत आपल्या राज्याच्या सीमेवरच्या जंगलात पाठवले होते. या अनामदेवाने देवी दंतेश्र्वरीच्या कृपेने बस्तर येथे आपली सत्ता प्रस्थापित केली व आपले स्वतंत्र राज्य उभे केले अशी बस्तर भागात श्रद्धा आहे.

त्याआधी बस्तरवर नागवंशी राजे राज्य करीत असत. या राजांनी बस्तरमध्ये अनेक मंदिरे बांधली. त्यातली काही प्राचीन मंदिरे हजार वर्षांनंतरही बस्तरमध्ये उभी आहेत. इंद्रावती आणि नारंगी ह्या दोन नद्यांच्या संगमावर बांधलेले नारायणपालचे नऊशे वर्षे जुने विष्णू मंदिर हे त्यातले एक प्रमुख मंदिर.

हे मंदिर बस्तरमधील छिंदक नागवंशी राजांच्या गतवैभवाचे एक गौरवशाली स्मारक आहे. नागर स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर म्हणजे नागवंशी राजांच्या काळात प्रगत झालेल्या वास्तुकलेचा उत्तम पुरावा आहे.

मंदिरात असलेल्या प्राचीन शिलालेखावरून स्पष्ट होते की मंदिर जरी राजघराण्यातील राणीने बांधायला घेतले होते तरी बस्तर राज्यातले सामान्य नागरिक उदार हस्ते विविध स्वरूपाचे दान देऊन मंदिराच्या बांधकामात सढळ हाताने सहकार्य करत होते. संपूर्ण बस्तर भागातील हे एकमेव विष्णू मंदिर, कारण इथले आदिवासी पूजा करतात ती शिवाची आणि देवीची.

नारायणपाल मंदिर बस्तरच्या प्रमुख शहरापासून म्हणजे जगदलपूरहून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातला एक सर्वात रुंद धबधबा, चित्रकोट, इथून जवळच आहे. मंदिराचे बांधकाम नागर शैलीत झालेले असून मंदिर लाल वालुकाश्मात बांधलेले आहे. मंदिराचे शिखर सुमारे ७० फूट उंच आहे. इथे सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर नागवंशी राजा जगदेव भूषण याच्या विष्णू भक्त राणीने म्हणजे गुंडमहादेवीने तिच्या वयाच्या शंभराव्या वर्षी तिचा शूर पुत्र राजा सोमेश्वर देव याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ बांधायला घेतले.

१०६९ मध्ये चक्रकोटवर राजा राजभूषण सोमेश्वर देव याचे राज्य होते. सोमेश्वर देव यांचे राज्य म्हणजे चक्रकोटचा सुवर्णकाळ होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हे मंदिर बांधायला घेतले. ते पुढे तिच्या मृत्यूनंतर तिचा नातू आणि सोमेश्वर देवाचा पुत्र राजा कन्हारदेव याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याच वेळी, मंदिराच्या जवळ नारायणपूर नावाचे एक गाव देखील स्थापित केले गेले, जे आज नारायणपाल म्हणून ओळखले जाते. शिलालेखात नमूद केलेल्या तारखेनुसार इसवीसनाच्या ११११ वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे मंदिर आणि जवळचे नवीन वसवलेले गांव श्रीविष्णूला समर्पित करण्यात आले होते.

नारायणपाल मंदिराच्या आतच तो सुमारे आठ फूट उंचीचा काळ्या पाषाणात कोरलेला शिलालेख ठेवलेला आहे, ज्यात शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि गाय-वासराच्या आकृती कोरलेल्या आहेत. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येते पण म्हणावी तशी निगा राखली जात नाहीये.

मंदिराची वास्तुकला खजुराहोच्या नागर मंदिरांच्या धर्तीवर आहे. गर्भगृह, अर्धमंडप आणि मंडपामध्ये मंदिर विभागलेले आहे. उंच जगतीवर उभारलेल्या या मंदिराचे शिखर ७० फूट उंच आहे. पुढचा मंडप अष्टकोनी आहे. गर्भगृहात भगवान विष्णूची भग्न झालेली मूर्ती आहे. हे मंदिर कित्येक वर्षे भग्नावस्थेत होते. मंदिराचा पुढचा मंडप पाडण्यात आला होता. अशी आख्यायिका आहे की बस्तरच्या एका राजाने पुढे गुप्तधनाच्या लोभात मंदिराचा मंडप पाडला होता. या मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. आज हे मंदिर काही प्रमाणात त्याच्या मूळ स्वरूपात परत उभे राहिले आहे.

आकाराने छोटे असले तरी अतिशय प्रमाणबद्ध असे हे मंदिर आहे. मंदिराचे विमान सप्तरथ पद्धतीचे आहे, म्हणजे त्याचे उभे सात भाग पाडलेले आहेत. अष्टकोनी सभामंडपाचे छत फंसणा पद्धतीचे आहे. दुर्दैवाने मंदिराच्या भिंतीवरची सर्व देवकोष्ठे रिकामी आहेत. फक्त एकामध्ये श्री गणेशाची सुंदर उभी मूर्ती आहे. शिखर अत्यंत सुंदर आणि सुबक अशा नाजूक नक्षीने नटलेले आहे, वर आमलक आहे. गर्भगृहात जी श्रीविष्णूची मूर्ती आहे तिच्या हातात सुदर्शन चक्राबरोबरच नागवंशी राजवंशाचे प्रतीक म्हणून एक नागही दाखवलेला आहे. सभामंडपाचे छत आतून लहान लहान होत जाणाऱ्या दगडी वर्तुळांनी सुशोभित केलेले आहे. मुळात बस्तरला फार कमी पर्यटक भेट देतात, त्यातही या मंदिरात त्याहूनही कमी लोक जातात, त्यामुळे इथला परिसर अत्यंत स्वच्छ, रमणीय आणि शांत आहे. लोकांच्या वर्दळीपासून दूर असलेले हे हजार वर्षे जुने मंदिर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. आजकाल जगदलपूरला विमानतळ झाल्यामुळे या मंदिराला आणि बस्तरला भेट देणे पूर्वी होते तितके कठीण राहिलेले नाही. मुद्दाम भेट द्यावे असे हे आगळे वेगळे विष्णू मंदिर म्हणजे बस्तरची शान आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT