story of penance of vishwamitra Sakal
सप्तरंग

विश्वामित्रांची तपश्‍चर्या

आपल्या पुत्रांना शापदग्ध केल्यानंतर विश्वामित्र शुन:शेपाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला म्हणतात, ‘‘ज्या वेळी तुला वैष्णव वेदीवर पवित्र धाग्यांनी बांधलं जाईल,

सकाळ वृत्तसेवा

- विवेक देबरॉय

आतापर्यंत घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा घेऊ. यज्ञात बळी देण्याच्या उद्देशानं राजा अंबरीषानं शुन:शेपाला खरेदी केलं. मुनी विश्वामित्रांना पाहताच शुन:शेपानं त्यांच्याकडं जीव वाचविण्यासाठी विनंती केली. शुन:शेपाच्या ऐवजी तुमच्यापैकी कोणीतरी बळी जावे, अशी विनंती विश्वामित्रांनी त्यांच्या पुत्रांना केली.

मात्र त्या सर्वांनी नकार दिला. ते म्हणाले, ‘‘आपल्या पुत्रांचा त्याग करून इतरांच्या पुत्राचं संरक्षण तुम्ही कसं करू शकता? तुम्ही हे करणं योग्य नाही. हे म्हणजे कुत्र्याचं मांस भक्षण करण्यासारखंच आहे.’’

त्यांच्या या उत्तरानं विश्वामित्र संतप्त झाले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही अत्यंत मूर्खासारखे बोलला आहात आणि याद्वारे प्रत्यक्ष धर्माचीच निंदा केली आहे. तुमच्या शब्दांमुळं माझा उपमर्द झाला असून हे अत्यंत भयानक आहे. वसिष्ठांच्या पुत्राप्रमाणेच, तुम्ही सर्व जण कुत्र्यांचं मांसभक्षण करणाऱ्यांच्या कुळात जन्म घ्याल. त्याच स्थितीत पुढील एक हजार वर्षे तुम्ही पृथ्वीवर भटकत राहाल.’’

आपल्या पुत्रांना शापदग्ध केल्यानंतर विश्वामित्र शुन:शेपाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला म्हणतात, ‘‘ज्या वेळी तुला वैष्णव वेदीवर पवित्र धाग्यांनी बांधलं जाईल, कपाळावर कुंकू लावलं जाईल आणि गळ्यात माळ घातली जाईल, त्या वेळी अग्नीला उद्देशून मी सांगतो त्या प्रभावी शब्दांचा उच्चार कर.

अंबरीषाच्या यज्ञावेळी, या दोन दैवी ऋचा तू म्हण.’’ शुन:शेपानं त्या दोन्ही ऋचा मुखोद्गत केल्या. तो राजा अंबरीषाकडं गेला आणि म्हणाला, ‘‘हे नृपेंद्रा ! आपण लवकरात लवकर कार्याच्या ठिकाणी जाऊ. तुझं पवित्र कार्य पूर्ण होऊ देत.’’

ऋषिपुत्राचे हे शब्द ऐकताच राजा अत्यंत उत्साही आणि आनंदी झाला. तो तातडीने यज्ञ मंडपात गेला. सहायक पुरोहितांच्या परवानगीनं त्यानं यज्ञपशूला, म्हणजे शुन:शेपाला लाल रंगाचा पोशाख चढविला, त्याच्या अंगावर पवित्र चिन्हं रंगविली आणि वेदीला त्याला बांधलं.

त्या ठिकाणी असं बांधलं असताना, त्या ऋषिकुमारानं दोन ऋचा म्हणत विष्णू आणि इंद्र या दोन देवांना प्रसन्न केले. या स्तुतीनं इंद्र संतुष्ट झाला. त्यानं शुन:शेपाला दीर्घायुष्याचं वरदान दिलं. राजानंही त्याचा यज्ञ पूर्ण केला आणि इंद्राच्या आशीर्वादानं अनेक फळांची प्राप्ती झाली.

विश्वामित्रांनी पुष्कर इथं आणखी एक हजार वर्षे तपश्‍चर्या केली. ही हजार वर्षे पूर्ण झाली. आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर या तपस्व्यानं स्नान केलं आणि त्यांनी केलेल्या तपश्‍चर्येचं ईप्सित फळ देण्यासाठी देवांनी तेथे गर्दी केली. तेज:पुंज असलेले ब्रह्मदेव अत्यंत आश्‍वासक शब्दांत त्यांना म्हणाले, ‘‘हे भाग्यशाली ! आपल्या पवित्र कार्याच्या बळावर तू आता ऋषी बनला आहेस.’’ असा आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव स्वर्गलोकात निघून गेले.

यानंतर विश्वामित्रांनी पुन्हा एकदा मोठी तपश्‍चर्या केली. काही वर्षांनंतर स्वर्गातील अप्सरा मेनका तिथे अवतरली आणि पुष्कर कुंडात स्नान करू लागली. त्यांनी तिला पाहिलं, तिचे लावण्य केवळ अतुलनीय होतं आणि दाट नभांमध्ये जणू वीज चमकावी, तशी ती तेजस्वी होती. तिला पाहताच मदनाचा प्रभाव वाढून ते कामपीडित झाले आणि म्हणाले, ‘‘हे अप्सरे !

तुझे स्वागत आहे. तू इथंच, माझ्या कुटीत राहा. माझ्यावर ही अनुकृपा कर. मदनपीडेनं मी अगदी कासावीस झालो आहे.’’ मेनकेनं ते मान्य केलं आणि ती तेथेच राहू लागली. यामुळे विश्र्वामित्रांच्या तपश्‍चर्येमध्ये मोठीच बाधा आली. विश्वामित्रांच्या आश्रमात मेनका अत्यंत आनंदाने दहा वर्षे राहिली.

हा काळ संपल्यावर विश्वामित्रांना स्वत:चीच लाज वाटू लागली. आपल्या नैराश्‍याला दूर करत ते विचार करू लागले. ‘‘माझ्या तपश्‍चर्येचा भंग करण्यासाठी सर्व देवांनी मिळून हे घडवून आणले आहे. दहा वर्षांचा कालावधी एका दिवसासारखा उडून गेला. इच्छा आणि संभ्रम यांनी माझा ताबा मिळविल्याने हा अडथळा आला.’’ त्यांनी उसासा सोडला. ते पुन्हा पुन्हा विलाप करू लागले. हे दृश्‍य पाहून मेनकाही भयभीत होऊन थरथर कापत असल्याचे त्यांनी पाहिले.

ती त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. (शाप मिळण्याची तिला भीती वाटत होती.) मात्र, कौशिकांच्या एका पुत्राने अत्यंत प्रेमळ शब्दांत तिला निघून जाण्याची विनंती केली. यानंतर विश्वामित्र उत्तरेकडील पर्वतांमध्ये (कदाचित हिमालय) गेले.

आपल्या इच्छांवर विजय मिळविण्यासाठी या तेज:पुंज विश्वामित्र ऋषींनी त्यागपूर्ण जीवन जगण्यास सुरुवात केली. कौशिकी नदीच्या किनारी त्यांनी अत्यंत कठोर तपाचरण केले. उत्तरेकडील पर्वतांमध्ये त्यांनी एक हजार वर्षे केलेल्या अत्यंत उग्र तपामुळे प्रत्यक्ष देवही भयभीत झाले. अनेक ऋषी आणि देव एकत्र आले आणि त्यांच्यात चर्चा झाली. राजा कुशिकाच्या वंशातील हा पुत्र ‘महर्षि’ ही मान्यता मिळविण्यास पात्र असल्याचा त्यांनी निर्णय घेतला.

ही देववाणी ऐकताच सर्व विश्‍वाचा पितामह असलेला ब्रह्मदेव अत्यंत मधुर शब्दांत तपस्वी विश्वामित्रांना म्हणाला,‘‘ हे पुत्रा ! हे महर्षि ! तुझे स्वागत आहे. मी तुझ्या कठोर तपाचरणानं प्रसन्न झालो आहे. हे कौशिका ! मी तुला महर्षि म्हणून मान्यता देत आहे.’’ त्यांचे हे शब्द कानावर पडताच तपस्वी विश्वामित्रांनी त्यांना हात जोडून नमन केलं.

ते ब्रह्मदेवाला म्हणाले, ‘‘मी माझ्या पवित्र कार्याद्वारे अतुलनीय पुण्य प्राप्त केले असेल, मी माझ्या वासनांवर विजय मिळविला असेल, तर तुम्ही मला ब्रह्मर्षि असे म्हणावे.’’ ब्रह्मदेव उत्तरला, ‘‘तू अद्यापही तुझ्या वासनांवर पूर्णपणे विजय प्राप्त केलेला नाहीस. त्यासाठी तुला अजून तप करावे लागेल.’’ ब्रह्मदेव स्वर्गात निघून गेले.

अन्य देवही निघून गेले. कृतनिश्‍चयी विश्वामित्रांनी आपले दोन्ही हात उंचावले आणि कोणत्याही आधाराशिवाय तसेच उभे राहत त्यांनी तपश्‍चर्या सुरू केली. ते केवळ वायू भक्षण करू लागले. उन्हाळ्याच्या दिवसांत ते पंचाग्नी बाळगत असत (चार दिशांना चार अग्नी आणि डोक्यावर सूर्य). पावसाळ्याच्या दिवसांत खुलं आकाश हेच त्यांचे छत होते.

हिवाळ्यात हा तपस्वी, दिवस असो वा रात्र, पाण्यातच निद्रा घेत असे. त्यांनी असे उग्र तप एक हजार वर्षे केले. महान विश्वामित्रांची अशी तपश्‍चर्या सुरू असताना वासव आणि इतर देवांना भय वाटू लागले.

यानंतर इंद्राने कौशिकाचा तपोभंग करण्याच्या उद्देशाने रंभा नावाच्या अप्सरेला पाचारण केले. तो म्हणाला, ‘‘रंभे, तुला देवांसाठी अत्यंत कठीण कार्य पार पाडावे लागणार आहे. तुला कौशिकांना आकर्षित करायचे आहे, त्यांच्या मनात वासना निर्माण करायची आहे.’’ हे ऐकून रंभा भयभीत झाली. यानंतर काय घडले, ते पुढील लेखात पाहू या.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून पुराणं आणि वेद तसेच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Survey : शक्तिपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा अद्याप नाही; सर्वेक्षणास सहकार्य करा, शंभूराज देसाईंच्या शेतकऱ्यांना सूचना

पोलिस निरीक्षकांना पदोन्नती अन्‌ अंतर्गत बदल्या! सोलापूर शहरातील 4 ‘पीआय’ पदोन्नतीच्या यादीत, तिघांची होणार खांदेपालट; 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

सोलापूरच्या पोलिस पथकावर पाथर्डीत गोळीबार! जेऊर येथील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरण; साथीदारांसह आरोपी फरार, अक्कलकोट तालुक्यातील एकजण अटकेत

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ जून २०२६ ते १२ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

साधी कॉफी विसरा! केळं घालून बनवा व्हायरल Banana Coffee; शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT