सातारा : वाहनचालक परवाना (लायसन्स) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नागरिकांना घरपोच टपालाद्वारे मिळतो. मात्र, अनेकदा काही अडथळ्यांमुळे परवाना परत परिवहन कार्यालयात येतो. यामध्ये ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत 57 हजार 486 वाहन परवाने परिवहन कार्यालयाने टपालाद्वारे पाठविले असून, 968 परवाने परत कार्यालयाकडे आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढल्यानंतर एक महिन्याच्या आत नागरिकांना घरपोच टपालाद्वारे पाठविला जातो. मात्र, परवाना काढताना देण्यात आलेल्या अर्जात काही वेळा नजरचुकीने चुकीचा पत्ता टाकण्यात येतो, तर अनेकदा दिलेल्या पत्त्यावरील राहण्याचे ठिकाण नागरिकांनी बदललेले असते. यांसारख्या अनेक अडचणींमुळे परवाना घरपोच पाठविताना टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याप्रसंगी परवाना पुन्हा परिवहन कार्यालयात जमा करण्यात येतो. हा परवाना एक महिन्यानंतर घरपोच न झाल्यास नागरिकांची धावपळ सुरू होते. यामध्ये वाहन परवाना काढावयाची पद्धत ऑनलाइन असल्याने कोणत्याही नागरिकाचा परवाना गहाळ होत नाही. मात्र, तो मिळविण्यासाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे पाहावयास मिळते.
परिवहन कार्यालयाचे आवाहन
वाहन परवाना काढल्यानंतर नागरिकांना एक ते दीड महिन्याच्या आत परवाना टपालाद्वारे दिलेल्या पत्त्यावर येतो. एखाद्या वेळेस अर्जावरील पत्त्यात बदल झाल्यास किंवा इतर काही कारणांमुळे परवाना कार्यालयात परत येतो. त्यामुळे वाहन परवाना काढूनही टपालाद्वारे मिळाला नसल्यास कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन आरटीओ विभागाने केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.