crime news esakal
सातारा

सातारा : अनैतिक संबंधातून पत्नीसह प्रेयसीचा काढला काटा

वाईत पुन्हा धोम हत्याकांडाची पुनरावृत्ती?, नितीन गोळेकडून खुनाची कबुली

विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : व्याहळीच्या (ता. वाई) खुनातील फरारी असलेला आरोपी नितीन आनंदराव गोळे (वय ३८) याला बेळगाव (Belgaum) येथे भुईंज पोलीस ठाण्याचे (Bhuinj Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व सहकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान स्वत:ची पत्नी मनीषा नितीन गोळे (वय ३४, रा. व्याजवाडी) हिचा १ मे २०१९ रोजी खून करून स्वतःच पत्नीच्या मिसिंगची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. तिचा मृतदेह डोंगर परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. त्याचबरोबर संध्या शिंदे हिचा देखील गळा आवळून खून केल्याचीही कबुली दिल्याने भुईंज पोलिसांसह वाई तालुक्यातील जनतेमध्ये खळबळ उडालीय.

धोममधील डॉ. संतोष पोळने ६ महिलांचा खून करून त्यांनाही स्वतःच्या अंगण व फार्म हाऊसमध्ये खड्डे काढून जमिनीत गाडले होते.

वाईत पुन्हा धोम हत्याकांडाची पुनरावृत्ती?

धोम येथील डॉ. संतोष पोळने (Dr. Santosh Pol) ६ महिलांचा खून करून त्यांनाही स्वतःच्या अंगण व फार्म हाऊसमध्ये खड्डे काढून जमिनीत गाडले होते. त्या खुणांना स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व वाई पोलिसांनी वाचा फोडून ६ महिलांचे मृतदेह फार्महाऊस व अंगणातून काढून जगामध्ये नावलौकिक प्राप्त केला होता. त्याचीच पुनरावृत्ती वाई तालुक्यातील व्याहळी व व्याजवाडी हद्दीत राहणा-या नितीन गोळे याने दोन महिलांचा खुनाची कबुली देऊन पुन्हा वाई तालुक्याला हादरा दिला असल्याने वाई तालुक्यात (Wai Taluka) खळबळ उडाली आहे.

असा लावला आरोपीचा छडा

भुईंजचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांच्या सहका-यांनी या दुहेरी महिलांच्या खुनाला वाचा फोडल्याने त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अजितकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे यांच्यासह वाई तालुक्यातील जनतेने खुनाला वाचा फोडल्याबद्दल भुईंज पोलिसांचे अभिनंदन केले आहे. भुईंज-सातारा येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा खून झाल्याची फिर्याद आल्यावर भुईंज पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. त्यानंतर २४ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात भुईंज पोलिसांना यश आले. याबाबत अधिक माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झालेल्या संध्या विजय शिंदे (वय ३४ रा. कारी, ता. जि. सातारा) या बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. दरम्यान, मंगळवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसले (ता. वाई) येथील उसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रे यांची पडताळणी केली. त्यानंतर सदर मृतदेह हा संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीसांनी शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविला. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खूनच असावा, असा प्राथमिक अंदाज बांधून सपोनि कांबळे यांनी घटनास्थळापासून तपासाला सुरुवात केली.

Crime Case

मोबाईल लोकेशनच्या आधारे खुन्याचा शोध

मोबाईल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यंत पोहचण्यासाठी विशेष पथक रवाना केले. बुधवारी सकाळी कारी (ता. जि. सातारा) येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात येवून संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे रा. व्याहळी (ता. वाई) यांनीच केला असल्याची फिर्याद दिली व तातडीने संशयित आरोपीला अटक करा, अशी मागणी केली. यावरून भुईंज पोलीसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. परंतु, अद्याप तो सापडला नव्हता. त्यासाठी सपोनि कांबळे, डी. बी. पथकातील रविराज वर्णेकर, प्रसाद दुधस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोरडमल, आनंदराव भोसले, बापूराव धायगुडे, प्रियांका कदम, दिपाली गिरी-गोसावी, सातारा एलसीबीचे सपोनि रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तमराव दबडे, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, रवी वाघमारे, सचिन ससाणे या सर्वांनी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे या टीमने फरार आरोपी असलेला नितीन गोळेच्या शोधासाठी वैराटगड पायथ्याशी असलेला डोंगरद-या परिसर रात्रंदिवस फिरून शोधण्याचा प्रयत्न केला असता अपयश आले होते.

कर्नाटकातील बेळगावात रचला सापळा

आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन थेट कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सपोनि कांबळे यांना ९ ऑगस्ट रोजी मिळाली होती. त्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून काल १० रोजी ५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याला भुईंज पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक करून त्याच्यावर दोन महिलांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, मयत संध्या शिंदे व त्याची स्वतःची पत्नी मनीषा नितीन गोळे (वय ३५ वर्षे, रा. व्याजवाडी) हिचा देखील दिनांक १ मे २०१९ रोजी खून करून तिचाही मृतदेह त्याने पुरून टाकल्याची कबुली भुईंज पोलिसांना दिली आहे. आरोपीस दिनांक १२ रोजी वाईच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

खुनामागील नेमकं कारण..

मनिषा गोळे ही नितीनच्या माघारी मोबाईलवर बोलत असे. त्यासंदर्भात तिला नितीनने अनेक वेळा विचारले असता, ती उडवा-उडवीची उत्तरे देत होती. त्याचाच राग अनावर झाल्याने तिला ठार मारुन, पुरुन टाकले तर दुसरी व्यक्ती संध्या शिंदेचेही अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर तिलाही त्याने संपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT