विसापूर (जि. सातारा) : विसापूरसह पुसेगाव (ता. खटाव) परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाची सुगी उरकून रब्बी ज्वारी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली. मात्र, परतीच्या पावसाने अचानक लावलेली हजेरी रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. सोमवार दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतांत लवकर वाफसा येणार नसल्याने येथील शेतकऱ्यांची पंचाईत होणार आहे. परिणामी, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी आठवडाभर पाऊस असाच राहिला तर रब्बी ज्वारीची पेरणी होण्यास 15 दिवस विलंब होणार आहे.
परतीच्या पावसाने मागास खरीप पिकांची अवस्था मोठी चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने वाफसा सोडाच, परंतु आहे ती पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मुसळधारेमुळे काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे आणि आगाप लागवड केलेल्या कांद्याचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्वारीच्या पेरणीचा हंगाम लांबत गेल्यानंतर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. रब्बी ज्वारीचे क्षेत्र व उत्पादन वाढल्यास मुबलक चारा उपलब्ध होतो. मात्र, ज्वारीची पेरणी लांबणार असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
या परिस्थितीचा विचार करता खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातील उत्पादन कमी झाल्यास त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल उडून जाण्याच्या भीतीने नुकतीच रब्बीतील ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, परतीच्या पावसाने नुकत्याच पेरलेल्या ज्वारीचे पीक धोपटले गेले आहे. परिणामी, पीक उगवण्याची खात्री नसल्याने दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर येणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.