सातारा : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नेत्र रुग्णालय सुरू करण्याची जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसांत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. सध्या केवळ अत्यंत आवश्यकता असलेल्या रुग्णांच्याच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची खासगी रुग्णालयातील उपचारासाठी सोसाव्या लागणाऱ्या भुर्दंडपासून सुटका होणार आहे.
मोतीबिंदू निर्मूलनाच्या राष्ट्रीय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयातील नेत्र रुग्णालयामध्ये होतात. त्याचबरोबर काचबिंदू व डोळ्याच्या अन्य विकारांवरही शस्त्रक्रिया होतात. खासगी रुग्णालयांमध्ये अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी 25 हजारांपासून ते लाखापर्यंतची ही रक्कम जाते. हा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकदा सामान्य रुग्ण शस्त्रक्रिया करत नाहीत. त्यामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे राष्ट्रीय योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. तेथे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यम वर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात. कोरोना संसर्गाला सुरवात होण्यापूर्वी दररोज सुमारे दहा ते 12 जणांची शस्त्रक्रिया या ठिकाणी होत होत्या. मागील वर्षी जिल्ह्यातील तब्बल दोन हजार 750 नागरिकांवर शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
दुसऱ्या महायुद्धातील जगप्रसिद्ध काच कारखाना बंद; नेहरू, टिळकांनी दिली होती कारखान्यास भेट!
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली ही सुविधा मार्च महिन्यापासून बंद पडली होती. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड कमी पडू लागले. त्यासाठी नेत्र रुग्णालयातील वॉर्डमध्येही कोरोनाबाधितांना ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया बंद पडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद असल्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर झाला. त्यांना हजारो रुपये खर्च करावे लागले. येत्या दोन ते तीन दिवसांत नेत्र शस्त्रक्रियांना सुरवात होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेत्र रुग्णालयातील वॉर्डमध्ये पूर्वीप्रमाणे रुग्ण ठेवता येणार नाहीत. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सुरवातीला मोतीबिंदू पिकलेल्या व अत्यंत तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या रुग्णांवर दररोज तीन ते चार शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या तपासण्या होऊन फिटनेस दाखला मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाला दाखल करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोना चाचणी करून संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे आर्थिक नुकसान टळणार आहे.
नेत्र विभाग सुरू करण्यासाठी हालचाली
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर या ठिकाणचा कोरोना वॉर्ड बंद करण्यात आला आहे. तेव्हापासून नेत्र शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी हा विभाग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार नेत्र रुग्णालयाचा परिसर व शस्त्रक्रियागृह निर्जंतूक करण्यात आला. त्यानंतर वॉर्ड व शस्त्रक्रिया गृहातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोन नमुने निगेटिव्ह आले. तिसऱ्या नमुन्याचा अहवाल लवकरच प्राप्त हाेणार आहे.
अजमल कसाबला जिवंत पकडणा-या तुकाराम ओंबळेंचे स्मारक आजही दुर्लक्षितच
Edited By : Siddharth Latkar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.