यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे.
वाई : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची (Kaleshwari Devi) यात्रा येत्या २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार (Tehsildar) सोनाली मेटकरी यांनी केल्या.
यावेळी त्यांनी बांधकाम, पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन आदी सर्व विभागांचा कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. पंचायत समितीच्या देशभक्त किसन वीर सभागृहात काळूबाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे आदी उपस्थित होते.
बैठकीत सर्वच विभागांकडून अपेक्षित कामाचा आढावा घेण्यात आला. त्याबाबत काही अडचणी असतील तर त्या स्पष्टपणे सांगाव्यात. त्यावर वेळीच योग्य उपाय करणे शक्य होईल, असे सांगितले. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या कामाची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी आपल्या यात्रेपूर्वीच्या तयारी कामांचा आढावा मांडला.
नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, तसेच प्रशासन म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे सांगितले. यापुढील बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी सर्व माहिती, दिलेल्या कामाची जबाबदारी आणि नियोजन काय केले, याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे, असे सांगण्यात आले.
वाईहून मांढरदेवला वाईहून मांढरदेवला जाणाऱ्या रस्त्यावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केल्यास अडचण भासणार नाही. पार्किंग व्यवस्था पाहणाऱ्या ठेकेदाराने योग्य व चांगले काम करावे, अशी सूचना पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केली. गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी भोरमार्गे येणारा रस्ता खोदलेला असून, या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाईमार्गे वाहतूक वाढण्याची शक्यता वर्तवली. त्यासाठी भोरच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधून सदर रस्त्याचे काम लवकर व्हावे, याबाबत प्रयत्न करावे लागतील, असे सांगितले. या बैठकीस तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.