Satara 
सातारा

म्हारवंडचे माळीण व्हायची प्रशासनाला प्रतीक्षा?

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : भूस्खलनाच्या टांगत्या तलवारीखाली असलेल्या म्हारवंड (ता. पाटण) गावच्या पुनर्वसन व निवारा शेडप्रकरणी प्रशासनाची आंधळी कोशिंबीर थांबणार कधी, असा सवाल गावकरी विचारत आहेत. गत तीन वर्षांपासून गाव भूस्खलनाच्या विळख्यात अडकलेले असताना अधिकारी, लोकप्रतिनिधींची बेफिकिरी लोकांच्या अक्षरशः जिवावर उठली आहे. आताही पावसाळा सुरू झाला तरी सुमारे एक कोटी रुपये मंजूर निवारा शेडचे काम वाऱ्यावरच असून, ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहत आहेत. 

म्हारवंड हे 90 कुटुंब व सुमारे 500 लोकसंख्येचे गाव. कड्याखाली अतिदुर्गम क्षेत्रात वसले आहे. गत काही वर्षांपासून गावाला कड्यावरील महाकाय दगड व भूस्खलन या दोहोंच्या सावटाखाली पावसाळ्यात दिवस काढावे लागत आहेत. 2017 मध्ये सध्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी मांडल्यानंतर प्रशासनाने सर्व्हे करून केवळ 28 कुटुंबांना धोका असल्याचे घोषित केले. उर्वरित 60 कुटुंबे तशीच वाऱ्यावर सोडून दिली. या 28 कुटुंबांसाठी शासनाने 18 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या निकृष्ट दर्जाची निवारा शेड गतवर्षी उन्हाळ्यात वाऱ्याने जमीनदोस्त झाली. त्याबाबत तक्रार करूनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 

गत पावसाळ्यात भूस्खलन होऊन मोठा भराव वाहून गावच्या दिशेने आला. सुदैवाने यात जीवित व वित्तहानी झाली नाही. मात्र, भात पिकाचे मोठे नुकसान झाले. सर्व राडारोडा शेतात गेला होता. तर तीन दिवस गावचा रस्ता बंद होता, याचा भयंकर त्रास लोकांना झाला. निवारा शेड उडून गेल्याने लोकांना मंदिर, शाळा, सभागृह व पै-पाहुण्यांकडे आसरा घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात सुमारे एक कोटी 12 लाख रुपये खर्चून सात शेडचे काम सुरू केले. कार्यादेश सप्टेंबरमध्येच काढला. सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश असतानाही दहा महिने उलटले, पावसाळा सुरू झाला तरी काम पूर्ण झाले नाही. केवळ पाया व लोखंडी सांगाडा उभा आहे. पावसाचा जोर वाढून पुन्हा भूस्खलन झाले तर ग्रामस्थांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ई-मेलद्वारे नागरिकांनी व्यथा मांडली, वस्तुस्थिती सांगितली तरीही प्रशासन जागे होत नाही, याचे नवल वाटते. यामुळे लोकांच्यात तीव्र संताप पसरला असून, अधिकाऱ्यांनी तातडीने गावात येऊन पाहणी करून काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे. 

""निधीअभावी काम रखडलेले होते. नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती बैठकीत आढावा घेऊन काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांत शेडचे काम पूर्ण होईल.'' 

-समीर यादव, 
तहसीलदार, पाटण 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT