कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतात पीक घेतात. पिकांना लागणारे पाणी वीज कंपनीच्या कनेक्शनमार्फत मोटरद्वारे देतात. त्यासाठी शेतात ट्रान्स्फार्मर आणि फ्यूज बॉक्स पूर्वीच्या वीज महामंडळाने उभारलेले आहेत. मात्र, त्याला अनेक वर्षे झाल्यामुळे त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर उघडे पडलेले आहेत, त्यातील फ्यूज तुटले आहेत. फ्यूज बॉक्सच्या तशा दुर्घटनाग्रस्त स्थितीत शेतकरी रात्रीच्या वेळी वीज येत असल्यामुळे जीव धोक्यात घालून तुटक्या फ्यूज घालून मोटर सुरू करत आहेत. शेतकऱ्यांच्या जिवाची पर्वा करून "महावितरण'ने आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांवर वारंवार अनेक संकटे येतात. नैसर्गिक संकटांना तो रोखू शकत नाही. वातावरणातील बदलामुळे शेती पिकांवर अनेक रोगराई-किटकांचा हल्ला होत आहे. त्यातूनही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, तरीही येणाऱ्या संकटावर मात करत देशाचा अन्नदाता असलेला बळीराजा मोठ्या हिमतीने पुढे जात आहे. मात्र, तरीही त्याच्यापुढे मानवनिर्मित संकटे काही कमी होत नाहीत. शेतकरी घेत असलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना वीज कनेक्शन, ट्रान्स्फार्मर, फ्यूज बॉक्सची आवश्यकता असते. त्यासाठी पूर्वीच्या वीज मंडळाने शेतात त्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याला अनेक वर्षे झाल्यामुळे त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
अनेक ठिकाणी ट्रान्स्फार्मर उघडे पडले आहेत, त्यातील फ्यूज तुटले आहेत. त्यांची वेळच्या वेळी दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिली जात नाही. शेतीपंपांना रात्रीच्या वेळी वीज देण्यात येते. रात्री दहा- बारानंतर वीज मिळत असल्याने त्यांना रात्री मोटर सुरू करण्यासाठी जावे लागते. त्यासाठी रात्रीच्या वेळी दुर्घटनाग्रस्त असलेल्या फ्यूज बॉक्समध्ये फ्यूज घालून मोटर सुरू कराव्या लागत आहेत. यापूर्वी अशा धोकादायक फ्यूज बॉक्समुळे काही शेतकऱ्यांनी जीवही गमावला आहे. त्याची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आता "महावितरण'ने असे दुर्घटनाग्रस्त फ्यूज बॉक्स दुरुस्त करून शेतकऱ्यांना सुरक्षित करण्याची गरज आहे.
वारंवार दुर्लक्षच : शेतकरी दर महिन्याला वीज कंपनीची बिले भरतात. त्यांना चांगली सेवा देणे त्यांचे काम आहे. मात्र, शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा "महावितरण'कडे फ्यूजबॉक्स बदलण्यासंदर्भात मागणी केली आहे. ती मागणी योग्य आहे का, याची खात्री करण्यासाठी "महावितरण'नेही अशा दुर्घटनाग्रस्त फ्यूज बॉक्सची पाहणी करण्याची तसदी घेतलेली नाही.
रात्रीच्या वेळी शेतीपंपाची वीज येत असल्याने तुटलेल्या फ्यूज घालताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामध्ये दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. शेतकऱ्यांना वीज कंपनीने चांगले फ्यूज बॉक्स उपलब्ध करावेत. एखाद्याचा जीव जाण्याअगोदर "महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी.
-सुरेश फिरंगे, शेतकरी
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.