Pakistan Hacking Alert : भारतातील आर्थिक आणि डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघटना (CERT-In) ने देशातील सर्व बँका, आर्थिक संस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना अलर्ट करत सायबर सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगारी गटांकडून भारतातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर सायबर हल्ले होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.
7 मे रोजी भारतीय सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत सीमापार दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली होती. यामध्ये पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले, तेही कोणत्याही नागरिकाला इजा न पोहोचवता. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन घाटी येथे 26 निष्पाप नागरिकांची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच तीव्र झाला आहे.
या घडामोडींनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानस्थित सायबर हॅकर्सकडून वाढती सायबर हेरगिरी आणि घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
CERT-In ने आपल्या सायबर सुरक्षा सल्ल्यात म्हटले आहे की विशेषत: बँका आणि आर्थिक संस्था सध्या संभाव्य सायबर हल्ल्यांच्या प्रमुख लक्ष्यांपैकी एक आहेत. या संस्थांना आतल्या नेटवर्क मॉनिटरिंग सिस्टीम्स आणि अलर्ट यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याशिवाय, नासकॉमसारख्या औद्योगिक संघटनांसोबत समन्वय साधून थ्रेट-शेअरिंग नेटवर्क्स मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे. हे नेटवर्क्स संभाव्य सायबर हल्ल्यांची वेळेवर माहिती देण्यास उपयुक्त ठरतील.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही मोठा धोका निर्माण झाल्याचे CERT-In च्या अलर्टमध्ये म्हटले आहे. अनोळखी नंबरवरून किंवा अकाउंटवरून येणाऱ्या मेसेजेस, फाईल्स किंवा लिंक्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या फाईल्स अनेकदा 'फनी व्हिडिओ' किंवा 'व्हायरल कंटेंट'च्या स्वरूपात असतात. पण प्रत्यक्षात त्यामध्ये हानिकारक मालवेअर अथवा स्पायवेअर लपवलेले असते. एकदा मोबाईल किंवा संगणक यात गेला की संपूर्ण डेटा हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकतो.
या सायबर हल्ल्यांचा उद्देश केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणं, महत्त्वाची माहिती चोरणं आणि सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ पसरवणं हाही असतो. त्यामुळे सर्व सरकारी आणि खासगी संस्था तसेच नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे CERT-In ने स्पष्ट केले आहे.
सध्या भारत एक सशक्त आणि तंत्रज्ञानसक्षम राष्ट्र म्हणून पुढे जात आहे पण त्याचवेळी अशा सायबर हल्ल्यांची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने डिजिटल सुरक्षेचे मूलभूत नियम पाळणे, सोशल मीडियावर सतर्क राहणे, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणे आणि संशयास्पद फाईल्स/लिंक्स टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.