Pirwadi Sea Beach Sakal
टूरिझम

पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावरून पाहावी मुंबई!

समुद्रकिनारी असलेल्या मुंबईतील मोठ्या इमारतींमधून सागरदर्शन होते. वांद्रे-वरळी सागरी मार्गावरून थेट समुद्रावर स्वार होता येते.

प्रशांत ननावरे

समुद्रकिनारी असलेल्या मुंबईतील मोठ्या इमारतींमधून सागरदर्शन होते. वांद्रे-वरळी सागरी मार्गावरून थेट समुद्रावर स्वार होता येते.

समुद्रकिनारी असलेल्या मुंबईतील मोठ्या इमारतींमधून सागरदर्शन होते. वांद्रे-वरळी सागरी मार्गावरून थेट समुद्रावर स्वार होता येते. काही किनाऱ्यांवर ओहोटीच्यावेळी आतपर्यंत चालत जाता येते. अशा या मुंबईतून समुद्र दिसतो खरा; पण समुद्रकिनारी वसलेली मुंबई दुरून कशी दिसते हे पाहायचं असेल तर मुंबईच्या बाहेर पडावं लागेल. मुंबईपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावरून आकाशाच्या दिशेने वाढणारी मुंबई पाहता येते.

मुंबई आणि समुद्रकिनारा हे वेगळं समीकरण आहे. सोनेरी वाळू, खडकाळ, दूरदूरवर क्षितिजापर्यंत चमचमणारे पाणी, सुखावणारा सूर्यास्त आणि आबालवृद्धांच्या गर्दीने कायम जिवंत असणारे किनारे ही मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची वैशिष्ट्ये. मुंबईतील आत-बाहेर असलेले समुद्रकिनारे एकाच भूभागाला जोडलेले असले तरी आपले वेगळेपण जपून आहेत. ही समुद्रकिनारी वसलेली मुंबई दुरून कशी दिसते हे पाहाण्यासाठी एक दिवस उरणमधील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बघा.

पिरवाडी समुद्रकिनारी जाण्यासाठी उरणपर्यंत सार्वजनिक बस सेवा आहेत. स्वत:ची गाडी असेल तर आजूबाजूच्या परिसरातही अगदी मनसोक्त फिरता येते. उरणला जाण्याचा रस्ता नवी मुंबईमार्गे जात असल्याने नव्याने येऊ घातलेल्या विमानतळासाठी येथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. मुंबई सोडल्यानंतर नवी मुंबईत प्रवेश करताच आठ पदरी महामार्ग तुमचे स्वागत करतो. रस्त्याच्या दुतर्फा डोंगर आणि खाडीदर्शन व्हायला लागते. उरणमध्ये शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरव्यागार झाडांचे छप्पर तयार होते. समुद्रकिनाऱ्याकडे कूच करताना डाव्या बाजूला ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळा’चा (ओएनजीसी) एक प्लान्ट आहे. जीटीपीस-एमएसईबी हा नैसर्गिक वायूद्वारे चालवलेला आशियातील पहिला ऊर्जा प्रकल्प होय. येथे आत जाण्याची परवानगी नसली तरी बाहेरून भिंतीपलिकडच्या मोठ्या प्लान्टचे दर्शन घडत राहते. नैसर्गिक वायूंमुळे चिमणीतून बाहेर पडणारा आगीचा लोळ लक्ष वेधून घेतो. जवळच्या मोरा बंदराजवळ भारतीय नौदलाचा तळदेखील आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय नौदलाने या परिसरात आणि सागरी प्रवासावर निर्बंध लादले आहेत.

पिरवाडीला जवळपास १३०० मीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा किनारा थोडा खडकाळ असला तरी किनाऱ्यालगत गावातील शेती, नारळी-फोफळीच्या बागा आणि गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. उरणला समुद्राने वेढलेले असून पिरवाडी किनारा निसर्गसंपन्न डोंगर कुशीत आहे. पूर्वेला द्रोणागिरी हा भलामोठा डोंगर, दक्षिणेला रेवस जेट्टी, पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्र आणि उत्तरेला पसरलेली मुंबई असे वैशिष्ट्यकृत स्थान या किनाऱ्याला लाभले आहे. आडवी-उभी पसरलेल्या मुंबईचे दर्शन इथून करण्यात वेगळीच मजा आहे. पावसाच्या दिवसांत तर दूरवर पावसात चिंब भिजणारी मुंबई इथून दिसते. अथांग समुद्रावर आकाशातील काळे ढग मुंबईच्या शिरावर जमा होऊन वर्षाव करत असतानाचे चित्र कल्पनेपलिकडील असते. कायम तुंबलेली आणि नकोशी मुंबई पाहण्याची सवय असलेल्यांसाठी हा सुखद अनुभव ठरू शकतो.

पिरवाडीचा समुद्रकिनारा हा येथील स्थानिक रहिवाशांसाठी मनःशांती आणि करमणुकीचा स्रोत आहे. जवळच द्रोणागिरी डोंगर असून डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. त्या टेकडीवरून समुद्र किनारा, करंजा जेट्टी आणि तिथल्या होड्यांचे विहंगम दृश्य दिसते. सर्व ऋतूंमध्ये या किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असते. अलिकडेच एक मजबूत धूप प्रतिबंधक बंधारा किनाऱ्यावर बांधण्यात आल्यामुळे किनाऱ्याची शोभा अधिक वाढली असून, त्यामुळे नागाव गावातील शेतजमिनी व पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित झाले आहेत. किनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्यावर एक हेलिपॅड आहे. समुद्राच्या पाण्यात उतराचे नसेल तर या ठिकाणी गाडी पार्क करून समुद्राचे दर्शन घेता येऊ शकते. शेजारीच एक दर्गादेखील आहे. दर्गा छोटा असला तरी दर्ग्याचा परिसर मोठा आहे. पर्यटकांना निवांतपणे बसण्यासाठी भरपूर मोकळी जागा येथे आहे. लोक दूरवरून या दर्ग्यावर दर्शनासाठी येत असतात. झाडांच्या सावलीत बसतात. जवळच श्री आई मांगीनदेवीचे छोटे देवस्थानही आहे.

उरण परिसरात आल्यावर करंजा जेट्टीला भेट द्यायलाच हवी. पलिकडे रेवसला जाण्यासाठीच्या बोटी येथून सुटतात. प्रवासी आणि मच्छीमारांसाठी येथे मोठा धक्का बांधला आहे. सायंकाळी स्थानिक गावकऱ्यांची या धक्क्यावर गर्दी असते. धक्क्याला लागलेल्या मासेमारीच्या मोठमोठ्या बोटी पाहणे ही पर्वणी असते. निळ्याशार पाण्याच्या कडेला रंगीबेरंगी बोटींची नक्षी पाहून मन आनंदी होते. बोटीमधून उतरवली जाणारी ताजी मासळी आणि त्यांचा लिलाव पाहण्याची संधी इथे मिळते. सकाळी आणि संध्याकाळी मासळी खरेदीसुद्धा करता येते. स्थानिक मासळी बाजारापेक्षा कैकपटीने स्वस्त आणि विविध प्रकारचे ताजे मासे येथे विकत घेता येतात.

उरण मुंबईपासून जवळही नाही आणि दूरही. गेटवे ऑफ इंडियावरून बोटीने अलिबागला जातानाच्या रस्त्यात ते कायम दिसते, पण लोक क्वचितच तिथे जातात. मुंबईतील गर्दीचे समुद्रकिनारे टाळायचे असतील आणि मुंबईपासून सहकुटुंब थोडं दूर जायचं असेल तर एकाच भेटीत उरण, पिरवाडी समुद्रकिनारा आणि करंजा जेट्टी हे सर्वोत्तम पर्याय आहेत.

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT