Happy Fest
Happy Fest esakal
नाशिक

Nashik : हनुमान जन्मस्थळ विवादाला पूर्णविराम

महेंद्र महाजन

अंजनेरी (जि. नाशिक) : हनुमान जन्मस्थळ (Hanuman Birthplace Controversy) अंजनेरी की कर्नाटकमधील किष्किंधा (Kishkindha) या विवादावर आठवडाभरापासून तपोभूमी नाशिकमध्ये खल चालला होता. अखेर अयोध्येचे रामजन्मभूमीचे (Ayodhya Ramjanmabhumi) प्रमुख आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा ब्रह्मपुराणाच्या आधारे दिला आणि वादावर पडदा पडला. त्याबद्दलचा आनंदोत्सव गुरुवारी (ता. २) अंजनेरीच्या ग्रामस्थांनी साधु-संत-महंतांच्या साक्षीने ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला. ग्रामस्थांतर्फे विवादामध्ये अंजनेरीची बाजू लावून धरल्याबद्दल साधु-संत-महंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामसभा घेऊन धर्मध्वज उभारणीचा संकल्प केला जाईल, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. (Hanuman birthplace controversy comes to an end Nashik News)

अंजनेरीचे महंत अशोकबाबा, माजी उपसरपंच गणेश चव्हाण, राजाराम चव्हाण, पोलिसपाटील संजय चव्हाण, रमेश चव्हाण, राजू बदादे यांनी हा साधु-संत-महंतांचा सन्मान केला. श्री. पाठक यांचाही सन्मान ग्रामस्थांना करायचा होता; परंतु ते बुधवारी (ता. १) मुंबईला गेले, अशी माहिती या वेळी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी सदस्य कमळू कडाळी, माजी सरपंच मधुकर लांडे आदी उपस्थित होते.

रामायणामधील ‘कालनेमि’चा दाखला

रावणाचा बाण लागल्याने लक्ष्मण बेशुद्ध पडले होते. त्या वेळी संजीवनी घेण्यासाठी हनुमंतराय निघाले. अशात हनुमंतरायांना अडविण्यासाठी रावणाने पाठविलेला कालनेमि मायावी राक्षस प्रयत्न करत होता. हनुमंतरायांनी हे ध्यानात येताच, कालनेमिचा वध केला. ही आख्यायिका रामायणामधील आहे. बेझेच्या श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी आख्यायिकेचा दाखला दिला. ते म्हणाले, की किष्किंधाचे स्वामी गोविंदानंद सरस्वती हे काहीतरी उद्देश ठेवून त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिकमध्ये आले होते. ते अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असतानाही किष्किंधा हे जन्मस्थळ असल्याचे सांगून दिशाभूल करत होते. मात्र इथे डाळ शिजत नाही म्हटल्यावर स्वामींनी नाशिक सोडणे पसंत केले.

महंत सुधीरदास पुजारी यांनी ग्रामसभा घेऊन ‘हनुमान जन्मस्थळ अंजनेरी’ असा ठराव घेऊन घ्यावा, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती, महंत सुधीरदास, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, स्वामी श्रीकंठागिरी महाराज, ठाणापती रतनगिरी महाराज, पिनाकेश्‍वर गिरी महाराज, आखाडा परिषदेचे सचिव महंत उदयगिरी महाराज, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती, सुदर्शनानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, ठाणापती महंत पर्वतगिरी महाराज, स्वामी विश्‍वस्वरूपानंद सरस्वती, श्रीनाथानंद सरस्वती, ठाणापती दुर्यानंद ब्रह्मचारी, ठाणापती ब्रहस्पती गिरी महाराज, ठाणापती अभयानंद ब्रह्मचारी, अजयपुरी महाराज, ठाणापती शुक्रापुरी महाराज, महंत राकेशगिरी महाराज, ब्रह्मचारी राजू महाराज, खडकेश्‍वर गिरी महाराज, नारायण गिरी महाराज, लखनगिरी महाराज, दत्तगिरी महाराज, श्रीशंकर गिरी महाराज, उमागिरी महाराज, परमानंद महाराज, रघुवीर गिरी महाराज आदींचा ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला.

‘सकाळ’ माध्यम समूहाचा गौरव

हनुमान जन्मस्थळ अंजनेरी की किष्किंधा या विवादामध्ये उत्तर मिळण्यासाठीची भूमिका ‘सकाळ’ माध्यम समूहाने स्वीकारली. त्याबद्दल ग्रामस्थांतर्फे ‘सकाळ’ माध्यम समूहाचा गौरव करण्यात आला. अंजनेरी मंदिराचे महंत अशोकबाबा यांनी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित साधु-संत-महंतांसोबत ग्रामस्थांनी टाळ्या वाजविल्या.

"अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ आहे हे सुरवातीपासून मी सांगत होतो. त्यासंबंधीचे पुरावे गडावर पाहावयास मिळतात. तरीही जन्मस्थळाबद्दलचा वाद पेटविण्याचा प्रयत्न केला गेला. अखेर सत्य पुढे आले आहे. त्याचा आनंद अधिक आहे." -महंत अशोकबाबा, अंजनेरी

"नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये सुरू असलेल्या वादातून अंजनेरीवासीय अखेर मुक्त झाले आहेत. अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असल्याचे पौराणिक दाखल्यातून साधु-संत-महंत आणि धर्मशास्त्र अभ्यासक, विद्वानांनी सिद्ध करून दाखविले. त्याबद्दल सर्वांचे ग्रामस्थांतर्फे आम्ही आभार मानत आहोत." -गणेश चव्हाण, माजी उपसरपंच, अंजनेरी

"हनुमान जन्मस्थळ अंजनेरी असून, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यावर धार्मिक ग्रंथांमधील उल्लेखांच्या आधारे शिक्कामोर्तब झाला. आता कोणीही वाद-विवाद करून भाविकांची धार्मिक भावना दुखावू नये. सर्वांमध्ये स्नेह आणि सलोखा राहून सामाजिक एकजूट टिकून राहावी."

-संजय चव्हाण, पोलिसपाटील, अंजनेरी

"पोथी-पुराणांमध्ये अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असल्याचा उल्लेख आहे, हे मी सातत्याने सांगत आलो. अखेर ते सिद्ध झाले. त्याचा आनंद वाटतो." -पिनाकेश्‍वर महाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT