नाशिक : यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात तापमानाने अक्षरश: कळस गाठल्याच्या परिस्थितीत नाशिककरांनी गुरुवारी (ता. १९) शून्य सावलीचा अनुभव घेतला. तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावरच म्हणजे ३९ अंश असले, तरी प्रचंड उष्म्यामुळे आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे हैराण झालेल्या नाशिककरांना त्यामुळे आता मॉन्सूनची आस लागल्याचे दिसून येत आहे.
मॉन्सूनने अंदमान प्रदेश जवळपास व्यापला असताना संपूर्ण भारतात उष्णतेची लाट जाणवत आहे. त्यातून यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. पण, उन्हाळा मात्र आता नको, नकोसा झाला आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिवशी अनुभवावयास मिळणारी ‘शून्य सावली’ गुरुवारी नाशिककरांनी प्रत्यक्ष अनुभवली. मात्र, त्याकडे केवळ मनोरंजनाचा भाग म्हणूनच बघितले गेले. लहान- थोरांनी प्रत्यक्ष उन्हात उभे राहून आपलीच सावली पूर्णत: पायाखाली गेल्याचे पाहण्याची इच्छा असूनही मोह टाळल्याचे यातून दिसून आले. तीव्र उन्हाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. परिणामी शहरात ऐन दुपारी बऱ्यापैकी शुकशुकाट होता. रस्त्यावरील बहुतांश विक्रेतेदेखील गायब होते. सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा गजबज बघावयास मिळत होती.
शीतपेय दुकानांमध्ये तुरळक गर्दी
उकाड्यामुळे हैरान झालेल्या नाशिककरांना त्यातल्या त्यात दिलासा देणारे शीतपेय व तत्सम पदार्थांच्या गाड्या, दुकानांमध्येसुद्धा फारशी गर्दी नसल्याचे अनोखे चित्र यानिमित्ताने बघावयास मिळाले. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तप्त दिवस अशीही नोंद अनेकांनी केली असावी, एवढा उष्मा दुपारी जाणवत होता. कामानिमित्त नाइलाजास्तव उन्हात जावे लागणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. जिवाची काहिली करणाऱ्या या उन्हापासून संरक्षणासाठी सनकोट, गॉगल, टोप्या आदींचा वापरही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.