मालेगावातील २९ प्लॅस्टिक
कारखाने बंद करण्याचे आदेश
--------------------------
दसाणेतील सरपंच, ग्रामसेवकांची तक्रार
सकाळ वृतसेवा
मालेगाव, ता. १५ : दसाणे (ता. मालेगाव) शिवारातील बेकायदेशीर प्लॅस्टिक कारखान्यांमुळे दसाने, खडकी व परिसरात वायू व जलप्रदूषण, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत होता. यासंदर्भात दसाणे येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत प्रांत अधिकारी नितीन सदगीर यांनी २९ प्लॅस्टिक कारखाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित कारखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची उत्पादन सुरू ठेवण्याची कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
दसाणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी दसाणे शिवारातील गट क्र. १३०, १३१, १३४, १४३ व १५७ येथील प्लॅस्टिक कारखान्यांमधून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुरामुळे व जलप्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार व अन्य आरोग्यविषयक त्रास होत असल्याची तक्रार प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. तसेच प्लॅस्टिक पिशव्या व पॅकेजिंग साहित्य शेतजमिनीत साचत असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्या अनुषंगाने प्रांताधिकाऱ्यांनी परिसरातील ५४ प्लॅस्टिक कारखानदारांना नोटिसा बजावल्या. दोन्ही बाजूंचे लेखी म्हणणे, युक्तिवाद, स्थळ पाहणी अहवाल आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचा विचार केल्यानंतर ९ सप्टेंबर २०२६ ला कारवाईचे आदेश देण्यात आले. परवानगी नसलेले २९ प्लॅस्टिक कारखाने आदेश मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत तत्काळ बंद करावेत. तसेच संबंधित कारखान्यांची वीजजोडणी खंडित करावी. उर्वरित सात प्लॅस्टिक कारखान्यांची पुढील ३० दिवसांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक प्रादेशिक अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून परवानगी व निकषांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कारखाने तातडीने बंद करावेत असे आदेशात म्हटले आहे. सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड. सुधीर अक्कर व ॲड. साई अक्कर यांनी कायदेशीर बाजू मांडली. या निकालामुळे गाव व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.