मुख्य अंक
----------------
३६-४
घोटी-त्र्यंबक चौपदरीकरणास लवकरच सुरुवात
जिल्हा प्रशासन : भूसंपादनाला येणार गती; पालघरशी वाढेल कनेक्टिव्हिटी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने घोटी-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली. लवकरच महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल. हा महामार्ग जव्हार-पालघरला जोडला जाणार असल्याने भविष्यात पालघरच्या कनेक्टिव्हिटीमध्येही भर पडणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महामार्गाचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहे. त्यात काही महामार्गाच्या नव्याने बांधणीसह सध्याच्या अस्तित्वामधील महामार्गाचे दुपदरीकरण आणि चौपदरीकण करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत घोटी-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांतील २३ गावांमध्ये या कामासाठी जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी प्रारंभी त्यास विरोध केला. शेवटी जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी व बाधित शेतकऱ्यांच्या बैठकी घेऊन सर्व शंकांचे निरसन केले. त्यामुळे या महामार्गाच्या उभारणीचा विरोध मावळला आहे.
जिल्हा प्रशासनाने या महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली. दोन आठवड्यांमध्ये सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात मुंबईकडून येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकेश्वर गाठणे सोयीचे होणार आहे. त्यासोबत हा रस्ता पुढे जव्हारमार्गे पालघरला जोडण्यात येणार आहे. या टप्प्यातदेखील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात नाशिक ते पालघरचा प्रवास अधिक जलद होईल. भविष्यात वाढवण बंदाऱ्याशी कनेक्टिव्हिटीकरिता हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे.
---
२०-२ चौकट
असा आहे घोटी-त्र्यंबकेश्वर मार्ग
- २३ गावांमध्ये १३२.०९ हेक्टरचे संपादन
- रस्त्यासाठी एकूण ६७१ गट बाधित होणार
- इगतपुरीत १२, त्र्यंबकला ११ गावांत संपादन
- सर्व गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया पूर्ण
---
१६-१
‘समृद्धी’चाही कनेक्ट वाढणार
राज्य सरकारने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग वाढवणला (जि. पालघर) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. इगतपुरीतील समृद्धीवरील भरवीर इंटरचेंन्ज ते वाढवण असा १०२ किलोमीटरचा कॅरिडॉर बांधण्यात येईल. या प्रकल्पासाठी दोन हजार ५२८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘समृद्धी’सोबतच घोटी-त्र्यंबकेश्वर-पालघर या राष्ट्रीय महामार्गामुळे वाढवण तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे पालघरला जाणाऱ्या प्रवाशांना पर्याय उपलब्ध होईल.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.