फोटो-NSK26H28825
कोलकाता : कोलकाता येथे झालेल्या ‘टीए-२.०’ परिसंवादात झालेल्या सामंजस्य कराराप्रसंगी मॅग्नस फार्म फ्रेशचे संचालक लक्ष्मण सावळकर व भारतीय सैन्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर एस. एस.पाटील.
सीमेवरील जवानांसाठी अन्नाचा ‘मिशन-रेडी’अंतर्गत होणार अन्नपुरवठा
------------------------------
मॅग्नस फार्म्सचे संशोधन : टेरिटोरियल आर्मी इनोव्हेशन सेलसोबत सामंजस्य करार
मुकुंद पिंगळे, सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : कृषिमालाचे मूल्यवर्धन आणि संरक्षण दलाच्या अन्नपुरवठ्याच्या गरजा यांची सांगड घालत मॅग्नस फार्म फ्रेश आणि टेरिटोरियल आर्मी इनोव्हेशन सेल यांच्यात कोलकाता येथे झालेल्या ‘टीए-२.०’ परिसंवादाप्रसंगी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत भारतीय लष्कर तसेच आव्हानात्मक परिस्थितीत कार्यरत असलेल्या जवानांच्या गरजा लक्षात घेऊन तयार खाद्यपदार्थांच्या संशोधन, विकास आणि नवोपक्रमासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.
भारतीय लष्करासाठी ''मिशन-रेडी'' या पोषणविषयक उपाय विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मका, बीटरूट यांसारख्या कृषिमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्याचा मॅग्नस फार्म्सचा अनुभव या संशोधनासाठी उपयोगी ठरला आहे. सैन्यातील जवानांसाठी ऊर्जा व प्रथिनांची गरज, अन्नाचे वजन व प्रमाण, प्रादेशिक आहारपद्धती, प्रशिक्षण, प्रत्यक्ष तैनाती, उंचावरील कार्यक्षमता आणि आपत्कालीन परिस्थिती यांचा विचार करून खाद्यपदार्थांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती मॅग्नस फार्म फ्रेशचे संस्थापक संचालक लक्ष्मण सावळकर यांनी दिली. सामंजस्य करारावेळी श्री. सावळकर व भारतीय सैन्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर एस. एस. पाटील हे उपस्थित होते. या माध्यमातून दुर्गम, उंच आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत तैनात जवानांसाठी पोषणमूल्ययुक्त, सुरक्षित, सहज वापरता येणारे आणि दीर्घकाळ टिकणारे तयार अन्नपदार्थ पुरवले जाणार आहे.
इन्फो...
अन्नपदार्थांची दीर्घकाळ टिकवणक्षमता
मॅग्नस फार्म्सच्या तयार खाद्यपदार्थ निर्मिती क्षमतेमध्ये अत्याधुनिक रिटॉर्ट प्रक्रिया तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा वाटा आहे. यामध्ये जर्मन तंत्रज्ञान तसेच पाण्यावर आधारित ''रिटॉर्ट'' प्रणालींचा वापर केला जातो. या नियंत्रित प्रक्रियेमुळे अन्नपदार्थांची दीर्घकाळ टिकवणक्षमता वाढवता येते, तसेच त्यांची गुणवत्ता आणि पॅकेजिंगची अखंडता कायम राखण्यास मदत होते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशी अन्नउत्पादने विकसित केली जात आहेत, ज्यांची साठवणूक, वाहतूक आणि वापर पारंपरिक शीतसाखळी व्यवस्थेवर अवलंबून न राहता करता येतो. त्यामुळे दुर्गम, प्रतिकूल आणि आव्हानात्मक कार्यक्षेत्रांसाठी ही अन्नउत्पादने विशेषतः उपयुक्त ठरू शकतात. योग्य पॅकेजिंग व प्रक्रियेमुळे उत्पादनांची सामान्य तापमानात ९ ते १८ महिन्यांपर्यंत टिकवणक्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विकसित केलेल्या या प्रक्रियेचा वापर सध्या स्वीटकॉर्न, बीटरूटसह विविध मूल्यवर्धित उत्पादनांसाठी केला जात आहे. याच तंत्रज्ञानावर आधारित तयार खाद्यपदार्थांच्या प्रायोगिक चाचण्या सेनेसोबत घेण्यात आल्या.
कोट...
प्रतिकूल परिस्थितीतही जवानांना पोषणमूल्यपूर्ण आणि विश्वासार्ह अन्न उपलब्ध करून देणे, हा या संशोधनामागील मुख्य उद्देश आहे. सेनेसाठी नफा-तोट्यापेक्षा सेवा महत्त्वाची मानून हा उपक्रम राबवत आहोत.आव्हानात्मक परिस्थितीतही पौष्टिक, दीर्घकाळ टिकणारे, वापरण्यास सोईस्कर आणि विश्वासार्ह अन्न उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.
- लक्ष्मण सावळकर, संस्थापक-संचालक, मॅग्नस फार्म फ्रेश लिमिटेड
--------