मंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही
---
पालकमंत्री महाजन : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी संयुक्तिक नसून, त्यांचा राजीनामा होणार नाही, अशी स्पष्टोक्ती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आश्रमशाळेतील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार मदत करण्यात आली असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.
शहरातील ठक्कर डोम येथे भाजपतर्फे आयोजित रांगोळी प्रदर्शनाला शनिवारी (ता. ५) मंत्री महाजन यांनी भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्यभरात आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनातील मागण्या सारख्याच आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न गांभीर्याने घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी आश्रमशाळेतील मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला प्रारंभी ताप व उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आश्रमशाळेतील ३० मुले रुग्णालयात दाखल असून, सध्या मुलांचा ताप कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कडक धोरण अवलंबिले असून, येत्या काही दिवसांत बदल दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना महाजन यांनी त्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. ओबीसी व मराठा समाजात विनाकारण वाद होऊ नये, अशी सरकारची भूमिका असून, त्या अनुषंगाने समतोल साधण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षावर टीका करताना त्या पक्षांना स्वत:चा जनाधार उरलेला नाही. त्यामुळे विविध आंदोलनांमध्ये जाऊन पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी सर्व अवयवांची तपासणी करून घ्यावी, असा टोला महाजन यांनी लगावला.
नियमात डीजे वाजवावा : महाजन
ध्वनिप्रदूषणात वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, हे खरे आहे. पण, सण-उत्सवही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेत डीजे वाजवावा, असे मत मंत्री महाजन यांनी व्यक्त केले. सण-उत्सव आनंद व उत्साहात साजरे करून इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन महाजन यांनी दिले.