फोटो -NSK26H28884
ॲड. साई अक्कर
----
लेखक : गोकूळ खैरनार -NSK26H28885
जनसेवेचे स्वप्न बाळगणारा युवा वकील साई अक्कर
-----
आई-वडिलांनी दिलेले संस्कार, गुरुजनांकडून मिळालेले ज्ञान व समाजसेवेचा कुटुंबातील वारसा पुढे अधिक दृढ करण्याचा संकल्प करत येथील युवा वकील साई सुधीर अक्कर यांनी आपल्या वकिलीचा श्रीगणेशा केला आहे. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न व जिद्द उराशी बाळगून या तरुण वकिलाने भविष्यातील मोठ्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
- गोकूळ खैरनार, मालेगाव
मालेगाव येथील प्रसिद्ध वकील ॲड. सुधीर अक्कर यांचे पुत्र असलेल्या ॲड. साई यांचे प्राथमिक शिक्षण मालेगावातच झाले. पहिली ते दहावीपर्यंतचे धडे त्यांनी काकाणी विद्यालयात गिरविले. विद्यार्थी दशेतील हा काळ साईसाठी अत्यंत खास होता. शाळेने केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर शिस्त, मैत्री, मेहनत, आत्मविश्वास आणि माणुसकी शिकवली असे ते आवर्जून सांगतात. शाळेतील मित्र, शिक्षक, वर्गातील आठवणी, विविध कार्यक्रम आणि त्या काळातील छोट्या-छोट्या गोष्टी आजही मनात सुंदर आठवणी म्हणून जिवंत आहेत. व्यक्तिमत्त्वाची पहिली पायाभरणी याच शालेय जीवनात झाल्याचा त्यांना अभिमान आहे.
साई यांचे अकरावी व बारावीचे शिक्षण महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात झाले. बारावीनंतर त्यांच्या समोर भविष्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते. आवड आणि विचार पाहता राजकारणशास्त्र, मानसशास्त्र किंवा भूगोल यापैकी एखाद्या विषयात पदवी घेण्याचा साईचा विचार होता. यापैकी एक क्षेत्रात जाऊन आत्मविश्वासाने यशस्वी होण्याचा मानस होता. याचवेळी आवडी व छंदांनी ॲड. साई यांना वेगळ्या दिशेला नेले. संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या कुतूहलामुळे साईने बीबीए - सीए व कॉम्प्युटर रिलेटेड एज्युकेशन निवडले. या शिक्षणामुळे व्यवसाय, व्यवस्थापन, संगणक आणि आधुनिक जगाची समज मिळण्यास मदत झाली.
आधुनिक तंत्रज्ञानाचे कित्ते अवगत करतानाच या सगळ्या प्रवासात साई यांच्या मनात एक स्वप्न कायम होते, ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ‘मला वकील व्हायचे’. यामुळे विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन तीन वर्षांचा एलएलबीचा अभ्यासक्रम निवडला. कायद्याचा अभ्यास करताना अनेक बाबींची जाणीव झाल्याचे ते सांगतात. वकिली म्हणजे फक्त न्यायालयात केस लढणे किंवा कायद्याची कलमे सांगणे नाही. वकील हा सामान्य माणूस आणि न्यायव्यवस्था यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असतो असे ते मानतात.
आई-वडील माझ्या या प्रवासामागची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यांनी मला शिक्षण, संस्कार, योग्य-अयोग्य यातील फरक आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शिकवण दिल्याचे ते आवर्जून सांगतात. आज मी जे काही आहे, त्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. माझ्या प्रत्येक यशामागे त्यांचे आशीर्वाद आणि त्याग असल्याचे ते अभिमानाने मान्य करतात. अंतिम स्वप्न मात्र केवळ स्वतःच्या करिअरपुरते मर्यादित ठेवायचे नाही. तर ज्ञानाचा आणि कायद्याचा उपयोग सामान्य जनतेसाठी करण्याचा त्यांचा मानस आहे. ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे योग्य कायदेशीर मदत मिळत नाही, अशा लोकांना योग्य मार्गदर्शन आणि शक्य तिथे कमी फीमध्ये कायदेशीर सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हे भविष्यातील माझ्या वकिली व्यवसायातील ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रासाठी काम करण्याचेही त्यांचे मोठे स्वप्न आहे. देशाचा विकास केवळ सरकारच्या प्रयत्नांनी होत नाही; त्यासाठी सुशिक्षित, जबाबदार आणि जागरूक युवकांची आवश्यकता असल्याचे त्यांचे मत आहे.
आजचा युवक हा उद्याचा भारत घडवणार आहे. त्यामुळे युवकांना शिक्षण, रोजगार, कौशल्य, कायदेशीर जागरूकता आणि योग्य संधी मिळणे आवश्यक आहे. भविष्यात युवकांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी काम करण्याचे मानस आहे. राजकारण हे सत्ता मिळवण्याचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम असावे. कायदा न्याय समजून घेण्याची ताकद देईल, शिक्षण विचार करण्याची क्षमता देईल आणि समाजसेवेची भावना त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करण्याची दिशा देईल अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. एक चांगला वकील होण्यापेक्षा सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा, युवकांना दिशा देणारा आणि देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारा नागरिक बनणे हे माझे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. साई यांनी ऑल इंडिया लेव्हल बार, एक्स एक्स आय २०२६ या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्याचा त्यांचा मानस आहे.
----------
चौकट
आजारी आजीची नित्य सेवा
साईला शालेय जीवनापासून क्रिकेट क्षेत्रात पदार्पण करावे असे वाटत होते. क्रिकेट किंवा वकील या पैकी कोणते क्षेत्र निवडावे अशा द्विधा मनःस्थितीत ते होते. मात्र वडील ॲड. सुधीर अक्कर यांच्या हट्टामुळे व सहयोगातून त्यांनी वकील म्हणून नावलौकिक प्राप्त केला. आजारी आजीची ते गेल्या चार वर्षापासून लहान बालकासारखी सेवा करीत आहेत. विधी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच आजीच्या सेवेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले.