मेनफिचर
शहर टुडे पान चारसाठी
-------
(एआयचे समर्पक चित्र वापरावे)
----
रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांचा दंडुका
----
दोन दिवसांत आठ गुन्हे दाखल; शहरातील अनाधिकृत वाहनतळासह व्यावसायिकांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, चौक व गर्दीच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे गाड्या उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या, सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमणे करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.
गेल्या दोन दिवसांत सुप्रिम कॉलनी, डी-मार्ट समोर, अजिंठा चौफुली, काशिनाथ चौक व टोलनाक्याजवळ केलेल्या संयुक्त कारवाईत अनेक हातगाडीचालक, रिक्षाचालक व व्यावसायिकांवर भारतीय न्यायसंहिता कलम २८५अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
शहरातील मुख्य रस्ते व चौकांत बेकायदेशीरपणे वाहने व दुकानांचे साहित्य मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. शनिवारी (ता.५) दिवसभर शहरात ठिकठिकाणी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सुप्रिम कॉलनीतील मुख्य रस्त्यावर कटींग दुकानाचे साहित्य मांडून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी इम्रान सादिक खाटीक (वय ३८, रा. तांबापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस नाईक दीपक महाजन करीत आहेत.
डी-मार्ट समोरील मुख्य रस्त्यावर ‘माउली मिसळ पाव''ची गाडी उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जगदिश पुंडलिक सुतार (वय ३९, रा. मेहरुण) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, तपास पोलिस नाईक गणेश वंजारी करीत आहेत. अजिंठा चौफुली परिसरातील हिरो शोरूमसमोरील रस्त्यावर अडथळा ठरेल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी चालक जावेद शफिक खाटीक (वय ४५, रा. एमआयडीसी) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक किरण पाटील करीत आहेत.
सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य
मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे नाश्त्याच्या गाड्या, दुकानांचे साहित्य व वाहने उभी केल्याने पादचारी व वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेक ठिकाणी अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करीत रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली.
----------
कोट
जळगाव शहरातील वाहतूक सुळीत राहणे व नागरिकांचा जीव सुरक्षित ठेवणे, ही आमची प्राथमिकता आहे. मुख्य रस्त्यांवर किंवा चौकांत बेकायदेशीरपणे वाहने उभी करणे अथवा दुकानांचे साहित्य मांडून रहदारीस अडथळा आणल्यास यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- बबन आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी, पोलिस ठाणे, जळगाव.