अन्य अवयवांना झालेल्या विकारांचा मूत्रपिंडावरही परिणाम
---
डॉ. देवदत्त चाफेकर : ‘किडनी संवाद’मध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : रक्त शुद्ध करण्याबरोबरच शरीरातील अनावश्यक घटक मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करते. हिमोग्लोबिनचे प्रमाण राखणे, शरीरातील पाण्याचे संतुलन आणि हाडांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यातही किडनीची भूमिका असते. शरीरातील अन्य अवयवांना झालेल्या विकारांचाही किडनीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. देवदत्त चाफेकर यांनी दिली.
किडनी विकाराबाबत सर्वसामान्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना आजाराची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचारपद्धती याबाबत शास्त्रीय माहिती मिळावी, या उद्देशाने आणि ४२ व्या पश्चिम विभागीय मूत्रपिंडविकार तज्ज्ञ परिषदेच्या निमित्ताने रविवारी (ता. ६) ‘किडनी संवाद : प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. टिळक रोडवरील औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात नामवंत मूत्रपिंडविकार तज्ज्ञांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या वेळी डॉ. देवदत्त चाफेकर, डॉ. कैलास शेवाळे, डॉ. मोहन पटेल, डॉ. विपुल गट्टानी, डॉ. अभिजित मोरे आणि डॉ. पार्थ देवगावकर यांनी किडनीच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देवदत्त चाफेकर यांनी किडनीच्या मूलभूत कार्याची माहिती देताना सांगितले, की किडनीबाबत संवेदनशील राहणे गरजेचे आहे. कारण, ती शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. डॉ. नागेश अघोर म्हणाले, की किडनीचे कार्य कमी होऊ लागल्यास त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. काही वेदनाशामक औषधांचा किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. किडनीचा आजार तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ राहिल्यास नुकसान भरून काढणे अवघड होऊ शकते. त्यामुळे आजाराचे वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. मूतखड्यांमुळेही किडनीचे नुकसान होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. डॉ. पार्थ देवगावकर यांनी मधुमेह हा किडनीविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे सांगितले. शरीराची प्रतिकारशक्ती कमी असणे, मूत्रसंसर्ग तसेच मूतखड्यांकडे दुर्लक्ष केल्यानेही किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः संसर्ग आणि मूतखड्याच्या समस्येवर वेळेत उपचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--चौकट
प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे
डॉ. कैलास शेवाळे, डॉ. मोहन पटेल, डॉ. विपुल गट्टानी, डॉ. अभिजित मोरे यांनी किडनीचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. किडनीचे कार्य, किडनीविकाराची लक्षणे, आजाराचे निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी सोप्या भाषेत उत्तरे दिली. डॉ. सुधीर संकलेचा यांनी संवादकाची भूमिका बजावली. डॉ. नागेश अघोर यांनी प्रास्ताविक केले.