आठ निरागस जीवांना मिळाली मायेची सावली
दत्तक प्रक्रियेतून नवे आयुष्य; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बालकांचा पालकांकडे ताबा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : आयुष्याच्या सुरुवातीलाच कुटुंबाच्या मायेपासून वंचित राहिलेल्या आठ निरागस बालकांच्या आयुष्यात बुधवारी नव्या आशेचा किरण उजाडला. प्रेम, जिव्हाळा आणि सुरक्षित भविष्याची आस असलेल्या या बालकांना अखेर हक्काचे पालक मिळाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत या आठ बालकांचा ताबा दत्तक पालकांकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी एका बाजूला बालकांना नवे कुटुंब मिळाल्याचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव असा भावनिक क्षण उपस्थितांनी अनुभवला.
बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दत्तक प्रक्रिया राबविण्यात येते. याच उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक-ग्रहण प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सहा राष्ट्रीय आणि दोन आंतरराष्ट्रीय अशा एकूण आठ बालकांच्या दत्तक आदेशाची ऑनलाइन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
या प्रक्रियेमुळे आठ बालकांना केवळ नवीन पालकच मिळाले नाहीत, तर त्यांच्या आयुष्याला प्रेमाची ऊब, मायेची सावली आणि सुरक्षित भविष्याची नवी दिशा मिळाली आहे.
दत्तक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, आधारआश्रमाचे राहुल जाधव आणि सुवर्णा जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी दत्तक इच्छुक पालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संस्थेच्या चौकटीतून कुटुंबाच्या कुशीत
बालकांचे संगोपन केवळ संस्थात्मक वातावरणात न होता, त्यांना शक्य तितक्या सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा दत्तक प्रक्रियेचा प्रमुख उद्देश आहे. मूल दत्तक घेणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, एका निरागस जिवाला नवे आयुष्य देण्याची मानवीय संधी आहे.
मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक बालकाला कुटुंबाचे प्रेम, जिव्हाळा आणि आधार मिळणे आवश्यक आहे. दत्तक प्रक्रियेमुळे अशा बालकांना आपलेपणाची नवी ओळख मिळते. ऑनलाइन पद्धतीमुळे या प्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीरता, सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यासही मदत होत आहे.
अशी पार पडते दत्तक प्रक्रिया
केंद्रीय दत्तक-ग्रहण प्राधिकरणाच्या माध्यमातून दत्तक प्रक्रिया कायदेशीर, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येते. यामध्ये इच्छुक पालकांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यानंतर पालकांचा ‘होम स्टडी रिपोर्ट’ तयार करण्यात येतो. पुढे उपलब्ध बालकांची माहिती व प्रोफाइल पाहून निवडीची प्रक्रिया होते.
बालकाची प्रत्यक्ष भेट, परस्पर स्वीकार आणि त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बालकाचा ताबा पालकांच्या स्वाधीन केला जातो. नाशिकमध्ये बुधवारी पार पडलेली ही प्रक्रिया अशाच आठ निरागस जीवांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरली.
फोटो क्रमांक :- एच-29249
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.