टुडे पान एकसाठी
---------------
पदक विजेत्या खेळाडूंना
दरमहा ५ हजारांची मदत
-------
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळविणाऱ्या खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या १३ ऑगस्टला झालेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७मधील प्रथम सभेत पदकविजेत्या खेळाडूंना दरमहा पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची शिफारस करण्यात आली होती. खेळाडूंच्या आहाराची गरज, सरावासाठी आवश्यक ऊर्जा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी लक्षात घेऊन ही शिफारस करण्यात आली होती. या निर्णयामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत खेळाडूंना आर्थिक आधार मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे आहार व सरावावर परिणाम होऊ नये, खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या योजनेचा उद्देश आहे. या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर अधिकाधिक पदके मिळविण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळणार आहे. या बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, प्रभारी अधिष्ठाता जगदीश पाटील, प्राचार्य एस. एस. राजपूत, प्राचार्य महेंद्र रघुवंशी, प्राचार्य शिवाजी पाटील, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. सुरेखा पालवे, डॉ. संदीप पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील उपस्थित होते.