लग्नसराईला ब्रेक;
बाजारपेठेत शुकशुकाट
येसगाव : रविवार (ता.१७) पासून सुरू होणाऱ्या अधिक ज्येष्ठ मासामुळे लग्नमुहूर्त व शुभकार्यांना एक महिन्याचा ब्रेक बसणार आहे. जूनमध्ये हिंदू धर्मपरंपरेनुसार अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती यासारखी शुभकार्ये टाळली जातात. अधिक मासामुळे अनेक गावांमध्ये लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. एक महिन्याहून अधिक काळ लग्नसराई बंद राहणार असल्याने शहरी तसेच ग्रामीण बाजारपेठेवरही त्याचा थेट परिणाम होणार आहे. अधिक मास समाप्त झाल्यानंतर १८ जूनपासून शुभ मुहूर्त सुरू होऊन विवाहसोहळ्यांची धामधूम वाढणार आहे. गेल्या काही दिवसांत लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू होती; मात्र अधिक मास सुरू झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिक मास धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात असला तरी ग्रामीण अर्थचक्रात लग्नसराई थांबल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर काही काळ मर्यादा येणार असल्याचे चित्र सध्या दिसून येणार आहे.