नंदुरबार: जिल्ह्याचा दुर्गम भागातील स्थलांतर रोखण्यासाठी विविध विभागांनी शासनाच्या विकास योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.
भगदरी आणि मोलगी(ता. अक्कलकुवा) गावातील विकासकामांची पाहणी दौरा डॉ. भारूड यांनी नुकताच केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मोलगी येथील आरोग्य सेवा, पोषण व पुनर्वसन केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सातपुडा सेंद्रीय भगर युनिट आणि भगदरी येथील जलयुक्त शिवाराची कामे, महुफडी अंगणवाडी, शेळी पालन , सिमेंट बंधारा, फळबाग लागवड, पॉली हाऊस, पशुवैद्यकीय दवाखाना आणि शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहांना भेटी दिल्या.
डॉ. भारूड यांनी पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, दुर्गम डोंगराळ भागात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन सोलर पंपची व्यवस्था करण्यात यावी. पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्यात यावेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यात यावे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करावी, यासाठी माहिती देण्यात यावी. शेळी पालन हा चांगला जोड व्यवसाय असून असे युनिट शेतकऱ्यांना देण्यात यावे. अपूर्ण विकासकामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.