यवतमाळ : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ५० हजार क्विटंलच्यावर कापूस खरेदी झाली आहे.
दिवाळीपूर्वीच कापूस वेचणीला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस आहे. शेतकरी शासकीय खरेदी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. परंतु परतीच्या पावसाने कापूस भिजल्याने ओलावा अधिक होता. सीसीआयकडून १२ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाचीच खरेदी केली जाते. परिणामी सीसीआयने असर्मथता दर्शविली. त्यामुळेच दिवाळीनंतर सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.
शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस आणायला सुरुवात झाली आहे. सीसीआयच्या राळेगाव, पांढरकवडा, वणी, खैरी, घाटंजी, शिंदोला तसेच मुकुटबन केंद्रावर कापसाची आवक वाढली आहे. सीसीआयकडून पाच हजार ८२५ रुपये प्रति क्विंटल दरात कापूस खरेदी केली जात आहे.
सध्या खासगी बाजारातही कापसाला पाच हजार ७२५ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे काही शेतकरी खासगी बाजाराकडे गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना नगदी रक्कम मिळत असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापूस विक्री करीत आहे. सीसीआयकडून दोन दिवसानंतर चुकारे दिले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चुकारे गतीने होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी शेतकरी आणण्याची शक्यता आहे.
सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र, पणनकडून अजूनही महूर्त ठरलेला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणनकडून तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. परिणामी अनेक भागातील शेतकरी पणनचे केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.