अहेरी (जि. गडचिरोली) : भामरागड तालुक्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल मागील वर्षापेक्षा या वर्षी चांगला लागला असून एकेकाळी कॉपीसाठी बदनाम असलेल्या या तालुक्याची प्रतिमा यंदा उजळून निघाली आहे. येथे शिस्तीत राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानात तालुक्यातील एकूण पाच कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 223 विद्यार्थीपैकी 198 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत.
यातील बहुतांश विद्यार्थी लोकबिरादरी हेमलकसा आश्रमशाळेतील आहेत. या शाळेचा निकाल 99 टक्के लागला. 42 विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, तर केवळ एक विद्यार्थी नापास झाला.
आदिवासी, अतिदुर्गम, संवेदनशील व नक्षलग्रस्त, अशी भामरागड तालुक्याची ओळख आहे. या ठिकाणी शिक्षणाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानासुद्धा येथील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या मेहनतीने हे यश प्राप्त केले आहे. पूर्वी भामरागड येथून परीक्षा देण्यासाठी नागपूर, चंद्रपूर व इतर ठिकाणाहून विद्यार्थी येत असत. येथून परीक्षा दिली, तर हमखास पास होण्याची गॅरंटी होती. ते सत्यसुद्धा होते.
परंतु मागील तीन वर्षांपूर्वी भामरागड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून अश्विनी सोनावणे या रुजू होताच. त्यांनी तालुक्यात कॉपीमुक्त अभियान राबविले. परीक्षा केंद्रावर विविध पथके निर्माण करून त्यांनी परीक्षेत होत असलेल्या कॉपीला लगाम लावला. त्या स्वत: सर्व परीक्षा केंद्रावर जाऊन सतत भेटी देत. केंद्रावर पूर्णवेळ थांबत असल्याने कॉपी बहाद्दरांचे धाबे दणाणले.
सुरुवातीला त्यांना विद्यार्थी, पालक व स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पण, त्यांनी यात कोणतीही तडजोड न करता आपले कॉपीमुक्त परीक्षा अभियान सुरू ठेवले. पहिल्या वर्षी दहावी व बारावीचा निकाल कमी लागला. पण यावर्षी नुकताच जो बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत कोणत्याही वाममार्गाचा अवलंब न करता आपल्या मेहनतीने घवघवीत यश मिळविले. याचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक यांच्यासोबतच कॉपीमुक्त अभियान गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे यांनासुद्धा आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व समजले व ते स्वत:च कोणतीही शिकवणी न लावता व शिक्षणाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानासुद्धा विपरीत परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांनी स्ययंअध्ययानातून अभ्यास करून हे यश मिळविले.
प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिळायला हवे, हाच शिक्षण शिक्षणाचा मुळ पाया आहे. हे लक्षात घेत प्रशासनाने या तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे यांनी तालुक्यात शिक्षणाचा झंझावात निर्माण केला. जिल्ह्यातील कॉपीमुक्त अभियान तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिशय तळमळीने राबविले. मागील वर्षी त्यांनी जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर पथके निर्माण करून हे अभियान प्रभावी पद्धतीने राबविले होते.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.