गडचिरोली : सध्या देशात आणि राज्यात पेशवाईचे सरकार असून उद्योगपतीसाठी काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा करू नये, या सरकारच्या काळात हक्कासाठी मोर्चे आणि आंदोलने मोठ्या प्रमाणात करावी लागत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप-सेना युतीला जनतेने धडा शिकवायला हवा, असे आवाहन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
गडचिरोली येथे "शिवस्वराज्य' यात्रेप्रसंगी सोमवारी (ता. 9) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापत्रे, युवक जिल्हा अध्यक्ष ऋषिकांत पापडकर, लीलाधर भरडकर उपस्थित होते.
खासदार कोल्हे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याचा विकासकामांवर परिणाम झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या सुरजागड प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झाले नाही. आबांच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र त्यानंतर सरकारने ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. सरकारने महाराष्ट्रातील गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. यामुळे फडणवीस सरकार आणखी काय काय करू शकते, याची जाणीव नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ले वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.