अकोला : कावड यात्रा... हा अकोलेकरांचे आध्यात्मिक भावविष्व समृध्द करणारा धार्मिक उत्सव. श्रावणातील शेवटच्या सोमवारी या कावड यात्रेचा उत्सव असतो. ग्रामदैवत राज-राजेश्वराला अभिवादन करण्याचा हा उत्सव आहे. 17 किलोमिटरवरून गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणून राजेश्वराला जलाभिषेक घालण्यात येतो. अकोल्यातील शेकडो कावड मंडळं आधल्या दिवशीच गांधीग्रामकडे पायी कूच करतात.
छोट्या मोठ्या कावड मंडळांची संख्या हजाराच्या घरात असते. अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील हजारो कावडधारी शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णानदीचे पाणी घेऊन अकोल्यात दाखल झाले आहेत. गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची 72 वर्षांची परंपरा आहे. खांद्यावरून सर्वाधिक भरणे आणण्याची स्पर्धा कावडधारी शिवभक्तांमध्ये रंगली आहे. जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची असून, यंदा 771 भरण्यांची (कळशी) कावड काढली आहे. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची 751 भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची 401 आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने 111 भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली आहे.
रोचक इतिहास
1944 साली स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना अकोल्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याच वेळी अकोल्यातील काही तरूणांनी ग्रामदैवताला जलाभिषेकाचा संकल्प केला. त्याच वर्षी मोठा पाऊसही पडला अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून ही यात्रा सुरू आहे. हजारावर भरणे कळशांची कावड मंडळं या यात्रेतील प्रमुख आकर्षण असते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.