वर्धा : लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवहार ऑनलाइन झाले. हे ऑनलाइन व्यवहार सायबर गुन्हेगारांसाठी पर्वणीच ठरल्याचे पुढे आले आहे. या गुन्हेगारांनी सर्वाधिक वापर होत असलेल्या काही खासगी ऍपचा लाभ उचलत बनावट ऍप तयार करून संदेश पाठवत बऱ्याच नागरिकांना गंडा घातला. वर्ध्यात दिवसाआड असे प्रकार घडत असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणांत गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
हे वाचा—भयानक! लग्नाचे आमिष दाखवून राजस्थानमध्ये होतेय महिलांची तस्करी
वर्ध्यात दाखल गुन्ह्यांपैकी पाच प्रकरणात ऑनलाइन व्यवहारात लंपास करण्यात आलेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत एक लाख 62 हजार रुपये परत आले आहेत. दाखल असलेल्या इतर गुन्ह्यातील रक्कम परत आणण्यासाठी सायबर पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ध्यात सायबर गुन्ह्याची सरासरी दिवसाआड तक्रार येत असल्याने जनजागृती करण्याकडे पोलिसांचा कल असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाउन जाहीर झाला त्या काळापासून आतापर्यंत ऑनलाइन फसवणुकीचे 40 गुन्हे दाखल झाल्याचे सायबर सेलच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वर्ध्यात फेसबुकचे मॅसेंजर हॅक
वर्ध्यात फेसबुकचे मॅसेंजर हॅक करून त्यातून फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्यांना संदेश पाठवून अडचण असल्याचे सांगत पैशाची मागणी करण्यात आली आहे. कोणी यावर नकार दिला तर त्याला शिवीगाळ करण्याचे प्रकार होत असल्याचे पुढे आले आहे. अशी अनेक प्रकरणी सायबर सेलकडे आल्याने त्याची नोंद घेत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. तर ज्यांना यात आर्थिक फटका बसला त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
मोबाईल क्रमांक पासवर्ड ठेवणाऱ्यांना धोका अधिक
फेसबुक आणि इ-मेल हॅक होण्याच्या प्रकरणात ज्यांचा पासवर्ड मोबाईल क्रमांक अथवा साधी माहिती असलेला आहे अशांना अधिक धोका असल्याचे यात पुढे आले आहे. यामुळे नागरिकांनी पासवर्ड ठेवताना तो ब्रेक होणार नाही असा ठेवावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सर्वाधिक प्रकरणे बनावट फोन पे ची
फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे बनावट फोन पे ची असल्याचे पुढे आले आहे. यात नागरिकांना संदेश पाठवून आमिष देत त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली. याला बळी पडून अनेकांना गंडा बसला आहे. याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांसंदर्भात नागरिकांना अनेकवार सावधान राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे असताना अनेक जण बळी पडत आहेत. फेसबुकचा असो वा इ-मेलचा पासवर्ड हा सहज ब्रेक होणार नाही असा ठेवावा. अनेकांनी त्यांच्या फेसबुकचा पासवर्ड त्यांचा मोबाईल क्रमांक आणि साधे अंक ठेवले आहेत. जो सहज ब्रेक होत असल्याने नागरिकांनी ते तत्काळ बदलवावे. या काळात तर साध्या संदेशांनाही नागरिक बळी पडल्याचे पुढे आले आले आहे. तशा तक्रारी आल्या आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. काही प्रकरणात नागरिकांची गेलेली रक्कम परत मिळविण्यात यश आले आहे.
- नीलेश ब्राह्मणे,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.