नागपूर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातील सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील शेतकरीही मदतीची वाट बघत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांचे सांत्वन करावे आणि योग्य मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केली आहे.
आपत्तीमुळे विदर्भातील नागपूर विभागात ६३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भात ५०,००० हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहेत. अकोला येथील शहापूर धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील सर्व पिके वाया गेली. कोविडच्या महामारीने जनता आधीच त्रस्त असताना या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारतर्फे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज आहे, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, असेही आशीष देशमुख म्हणाले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर व मराठवाड्याच्या उस्मानाबादला नुकतीच भेट दिली. कोकणात जाणार आहेत. पूर्व विदर्भात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक नष्ट झाले.
सोबतच यलो मोझॅकचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातून पीक गेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यामुळे त्यांनाही मदतीची गरज असल्याचे आशीष देशमुख यांनी म्हटले आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.