समीर गुजर व सुहास फडकर
समीर गुजर व सुहास फडकर 
नागपूर

व्हीसीए सिव्हिल लाइन्स झाले फडकर-गुजर यांच्या विक्रमी त्रिशतकी भागीदारीचे साक्षीदार

नरेंद्र चोरे

नागपूर : उत्तर प्रदेश संघाला नव्वदच्या दशकात पराभूत करणे फारच कठीण काम होते. त्या काळात उत्तर प्रदेश मध्य विभाग रणजी करंडकात अजेय संघ म्हणून गणला जात होता. मात्र, ती किमया कर्णधार सुहास फडकर यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ रणजी संघाने 32 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर करून दाखविली होती. स्वतः फडकर यांनी विक्रमी द्विशतक व समीर गुजरसोबत त्रिशतकी भागीदारी रचून विजयात निर्णायक योगदान दिले होते.


विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर नोव्हेंबर 1988 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कसोटीपटू गोपाल शर्मा, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, ज्ञानेंद्र पांडे, राहुल सप्रू, आर. पी. सिंगसारखे "मॅचविनर' असल्याने उत्तर प्रदेशचे पारडे जड वाटत होते. त्या तुलनेत यजमान विदर्भ संघ काहीसा कमकुवत होता. पण, खेळाडूंमध्ये एकजूटता होती, एकमेकांवर विश्वास होता. त्यामुळे कर्णधार फडकर, राजू पनकुले, समीर गुजर, हेमंत वसू, प्रवीण हिंगणीकर, प्रशांत वैद्य व युवा प्रीतम गंधेकडून खूप अपेक्षा होत्या. "स्पोर्टिंग विकेट'वर उत्तर प्रदेशने नाणेफेकीचा कौल मिळवून विदर्भाला फलंदाजीस पाचारण केले. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने सामन्याचा निकाल पहिल्या डावाच्या आघाडीवर लागेल, हे निश्‍चित होते. त्यामुळे पहिल्या डावात जास्तीतजास्त धावा काढण्यावर विदर्भाचा मुख्यत्वे भर होता. या परीक्षेत विदर्भाचे फलंदाज शंभर टक्के यशस्वी ठरलेत.

विदर्भाची सुरुवात थोडीशी डळमळीतच झाली. फलकावर शंभर धावा लागेपर्यंत आघाडीचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यामुळे संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची सर्व जबाबदारी पुन्हा एकदा भरवशाच्या फडकर यांच्यावर येऊन पडली. फडकर त्या काळात नेहमीच संघासाठी तारणहार बनून आले. सुदैवाने त्यांना गुजर यांची मोलाची साथ लाभली. दोघांनी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजीची पिसे काढत पाचव्या गड्यासाठी विक्रमी 315 धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. फडकर यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना 203 धावा फटकावल्या, तर दुसरे शतकवीर गुजर यांनी 115 धावांचे योगदान दिले. प्रशांत वैद्य यांनीही चौफेर बॅट फिरवून 44 धावांची वेगवान खेळी करत विदर्भाला पाचशेच्या (सर्वबाद 499) जवळपास पोहोचविले.

गोलंदाजांनीही केली कमाल
विदर्भाने पाचशे धावांचा डोंगर उभारून अर्धीअधिक लढाई जिंकली होती. आता सर्व मदार गोलंदाजांवर होती. तसेही पाठीशी भक्कम धावसंख्या राहिल्यास गोलंदाजांचे काम हलके होऊन जाते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्तर प्रदेशला 355 धावांत गुंडाळून 144 धावांची निर्णायक आघाडी घेतली. फिरकीपटू वसू यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी तीन बळी टिपून विदर्भाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. सामना पूर्णपणे खिशात आल्याने विदर्भाने त्यानंतर 1 बाद 49 धावांवर घोषित करून थोडी "एक्‍साईटमेंट' निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळेअभावी 194 धावांचे लक्ष्य उत्तर प्रदेशला गाठता आले नाही. उत्तर प्रदेशची 4 बाद 82 अशी स्थिती असताना पंचांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला आणि व्हीसीएवर विजयाचा जल्लोष झाला. विजयाचे शिल्पकार फडकर यांनी हा सामना त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगून, एका चांगल्या लढतीचा साक्षीदार राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तीन दशकांचा काळ लोटूनही त्रिशतकी भागीदारीचा "तो' विक्रम आजही अबाधित आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT