अचलपूर (जि. अमरावती) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतलेल्या व शाळेत क्वारंटाइन झालेल्या शिक्षित तरुणांनी तेलखार गावातील जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ करून वेगळा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाची थाप पडत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातून मेळघाटात मोठ्या प्रमाणात मजूर परत येत आहेत. त्यात शाळेत क्वारंटाइन व्हावे लागेल म्हणून काही लोक घाबरत आहेत; तर कोणी गावात राजकीय वजन वापरून शाळेतील विलगीकरणात राहणे टाळत आहेत. मात्र चिखलदरा तालुक्यातील तेलखार येथे क्वारंटाइन तरुणांनी शाळेत राहून त्याचे रुपडेही पालटून टाकले आहे.
पुण्या, मुंबईतून परत आलेल्या या तरुणांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ करून वेगळा संदेश दिला आहे. तेलखार गावात बाहेरून आलेल्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत क्वारंटाइन केलेले आहे, हे तरुण मूळचे याच गावातील रहिवासी आहेत. विविध शहरांत कंपनीत रोजगारासाठी ते गेले होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाउनमुळे गावात परतून क्वारंटाइन झाले.
त्यांनी जेवण, कपडे, स्वच्छतागृह अशा तक्रारींना दुय्यम स्थान देत शाळा स्वच्छतेचा निर्णय घेतला. उपलब्ध साधने वापरून त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. सोबतच झाडांना वाफे बनविणे, पाणी घालणे, शाळा खोल्या धुवून स्वच्छ करणे, अशी कामे या तरुणांनी केली. या निर्णयामुळे तहसीलदार माया माने व गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी त्यांची प्रशंसा केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.