यवतमाळ : शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी कापूस खरेदी सुरू झाली असली तरी खरेदीची गती पाहता शेतकऱ्यांची अडचण होत आहे. याच गतीने खरेदी सुरू राहिल्यास पावसाळ्यातही कापूस खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे. पावसापूर्वी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचे नियोजन पणन महासंघाने केले असून यासाठी कृषी विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल घरातच होता. परिणामी, खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस खरेदीची मागणी केली होती. त्यानुसार पणन महासंघाने खरेदी सुरू केली. मात्र, केंद्रावर ग्रेडर नसल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याच्या दृष्टीने एका दिवसात केवळ वीस गाड्या मोजण्याचे आदेश होते. याच गतीने खरेदी केल्यास ती पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. पावसात शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून आता पणन महासंघाने केंद्र वाढविण्याचे नियोजन सुरू केले आहे.
केंद्रावर ग्रेडरची आवश्यकता असल्याने कृषी विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी महासंघाने केली असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर केंद्र वाढविण्याचा विचार पणन महासंघाचा आहे. लॉकडाउनमध्ये महासंघाचे 58 केंद्रावर 82 जिनिंगमध्ये खरेदी सुरू आहे. या काळात महासंघाने राज्यभरात तीन लाख 57 हजार 820 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही केंद्र वाढविणार आहोत. ग्रेडर म्हणून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. संबंधित ठिकाणची स्थिती पाहून गाड्याची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदीचा आमचा प्रयत्न आहे.
-अनंतराव देशमुख, अध्यक्ष, पणन महासंघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.