वेलतूर (जि.नागपूर) : गोसेखुर्द धरणाचे पाणी गावात शिरले असल्याने बंद पडलेल्या रस्त्याअभावी सोनारवाई ग्रामस्थ चिखलयुक्त पाण्यातून जीवघेणी रहदारी करीत आहेत. गावात येणारे सारेच रस्ते प्रकल्पाच्या "बॅक वाटर'खाली आले आहेत. पाण्याखाली आलेल्या रस्त्यावरून सुरक्षित मार्ग काढण्यासाठी सध्या तरी ते बैलगाडीचा आधार घ्यावा लागत आहे.
गावात येण्यासाठी भिवापूर ते सोनारवाई हा एकमेव रस्ता आहे. तोही "बॅकवाटर' खाली आल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थ अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. पावसाळ्यातील आरोग्य समस्या त्यांना अधिकाधिक त्रस्त करीत आहे. अनेकांना तापाची लागण झाली असून धरणाच्या "बॅकवाटर'मधून वाट काढत ते वेलतूर, पचखेडी, फेगड, मांढळ येथील दवाखाने गाठत आहेत. कधी शेतशिवारातील धुरे तर कधी आंभोरा उपसा सिंचन योजनेच्या नहरावरून पायपीट करणारे ग्रामस्थ आता त्या शेतशिवारातही धरणाचे पाणी शिरून साचले असल्याने रहदारीस मुकले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून योग्य पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांची जीवघेणी परीक्षा देत आहेत. सिर्सी गटग्रामपंचायत अंतर्गत येणारे हे गाव कमी लोकसंख्येमुळे नेहमीच उपेक्षित राहात आले आहे. त्याच्या या कमी लोकसंख्येमुळे स्वतंत्र गावठाणाचा दर्जा मिळण्यास शासनदरबारी अडचणी असल्याची बतावणी अधिकारी करीत आहेत. सोनारवाई हे गाव सुरुवातीपासून स्वतंत्र महसुलाचे गाव असल्याने हेच स्वतंत्र अस्तित्व ग्रामस्थांना नव्या पुनर्वसीत गावठाणामध्येही हवे आहे. हे स्वातंत्र्य अधिकारी नाकारत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सातत्याने ग्रामस्थ न्यायालयात ही लढाई लढत असल्याने इतर पुनर्वसीत गावठाणातील जनता त्यांची पाठराखण करीत आहे. मात्र, रस्त्याअभावी गावकऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.