विदर्भ

शेतात नाही पाणी; पण डोळ्यांत अश्रूंचे पाट!

डॉ. गजानन वैद्य

महागाव (जि. यवतमाळ) : जिल्हा म्हणजे समस्यांची जणू खाणच. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गरीब, अशिक्षित आदिवासींचा जणू कुणी वाली नाही असेच चित्र आहे. महागाव तालुक्यातील आमडापूर प्रकल्पामुळे (Amdapur Project) विस्थापितांचे जगणे नशिबी आलेल्या शेतकऱ्यांची समस्या (problem of farmers) खूप ‘व्हायब्रंट’ वाटली. तीच जाणून घेण्यासाठी पुन्हा महागाव तालुक्याच्या दौऱ्यावर निघालो. ‘सकाळ’चे महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील बातमीदार डॉ. गजानन वैद्य यांनी रिसिव्ह केले. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी नांदावी, या उदात्त हेतूने आमडापूर लघू प्रकल्पाची निर्मिती झाली. ११२.५६ कोटी रुपये खर्च करून २००५ मध्ये काम पूर्ण झाले. परंतु या धरणामुळे शेतकऱ्यांची समृद्धी नव्हे तर अधोगती झाली. अतिशय अल्प मोबदल्यात शेतजमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची खंत वैद्य यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करीत करीत आम्ही विस्थापितांच्या गावात पोहोचलो. (The-Amdapur-project-in-Mahagaon-taluka-of-Yavatmal-district-is-of-useless)

आमडापूर लघू प्रकल्प महागावपासून पूर्वेस २५ किलोमीटरवर आहे. कुरळी गावातील छोट्याशा नाल्यावर हा प्रकल्प उभारला आहे. १९९१ मध्ये प्रकल्प मंजूर झाला. प्रत्यक्ष कामाला १९९५-९६ मध्ये सुरुवात झाली. २००५ मध्ये हे धरण पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरून वाहायला लागले. या धरणाची सिंचन क्षमता १,७३७ हेक्टर असून, खरीप सिंचनाची क्षमता ६६० हेक्टर तर रब्बीची १,०७७ हेक्टरवर आहे. प्रकल्पासाठी ७११.३३ हेक्टर आर. जमिनीची आवश्यकता असून, आजपर्यंत ६८६.६६ हेक्टर आर. जमीन संपादित केली आहे. सद्यःस्थितीत कुरळी, घमापूर, भोजू नाईक तांडा मिळून ३१६ घरांचे ऐच्छिक पुनर्वसन झाले.

आमडापूर प्रकल्पाचा सिंचन लाभ महागाव आणि उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. परंतु या प्रकल्पामुळे विस्थापित झालेले जे शेतकरी कष्ट करून आपल्या शेतात शेकडो टन ऊस पिकवीत होते, त्यांनाच आज उसतोड कामगार म्हणून गावोगावी भटकंती करावी लागत आहे. हक्काची शेती गेली, मुलांच्या शिक्षणाचे वांदे झाले. काही बोटावर मोजण्याएवढी मुले शिकून मोठी झाली. बाकी मजुरीवर खपली. धरणग्रस्तांचे प्रमाणपत्र असून एकालाही नोकरी नाही. हाताला काम नसल्याने काही सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागली.

आमडापूर प्रकल्पात माझी वडिलोपार्जित ३९ एकर जमीन गेली. त्याबदल्यात मला आतापर्यंत सहा लाख रुपये मिळाले. त्यात दोन लाख १० हजार रुपये विहिरीचा मोबदला मिळाला. तर ९५ हजार रुपये एक हेक्टरमधील संत्रा झाडांची भरपाई मिळाली. म्हणजे माझ्या ३९ एकर जमिनीचा मोबदला म्हणून फक्त तीन लाख रुपये मिळाले. कुरळी, घमापूर, भोजू नाईक तांडा येथील एकूण ३१६ घरांचे पुनर्वसन २००५ मध्ये झाले. त्यात भोजू नाईक तांड्यातील ८८ घरांचे फुलसावंगी पुण्येश्वर टेकडी परिसरात पुनर्वसन करण्यात आले. १५ वर्षांपासून पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधासुद्धा नाहीत. कुणालाही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.
- हिरामण भिकू आडे, धरणग्रस्त शेतकरी
आमडापूर, नारळी, टाकळी, घमापूर, इसापूर, फुलसावंगी, राहूर शिरपुल्ली, चिल्ली (ई), चिचोली, काळी (टेंभी) इत्यादी गावात या प्रकल्पातील पाण्यामुळे शेतीचे सिंचन वाढून शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी येईल, असे वाटत होते. परंतु पाटबंधारे विभागाचे अभियंते, अधिकारी किंवा कर्मचारी इकडे फिरकतसुद्धा नाहीत. प्रकल्पावर साधा चौकीदार नाही. त्यामुळे धरणाच्या कालव्यात मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे कालवा बंद अवस्थेत आहे. एखाद्या वेळी पाणी सोडले तर शेतकऱ्यांना जेसीबी मशीनच्या सहाय्याने कालवा स्वच्छ करून शेतात पाणी घ्यावे लागते.
- संतोष उत्तमराव वैद्य, धरणग्रस्त शेतकरी
पाटबंधारे विभागाच्या ज्या अभियंत्यांनी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी आणि नुसते कालवे खोदून ठेवण्यासाठी जी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता सिंचनाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी दाखवली असती तर आज शेतकऱ्यांच्या शेतात पिकं डोलत असती. आमडापूर नारळीपासून शेवटचे टोक साधारणतः १८ किलोमीटर अंतरावर आहे. २० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनसुद्धा आणि धरण पाण्याने लबालब भरले असताना केवळ नियोजनाअभावी शेकडो शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. पाणी सोडायला किंवा बंद करायला कुणी कर्मचारी किंवा अधिकारी मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे धरण पांढरा हत्ती ठरले आहे.
- शिवानंद नाईक, युवा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

(The-Amdapur-project-in-Mahagaon-taluka-of-Yavatmal-district-is-of-useless)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT