घुग्घुस (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील पती-पत्नीने गळफास लावून बुधवारला आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. दोघेही मृत पती-पत्नी नव्हते. चार वर्षांपूर्वी ते लिव्ह-इनमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे. दरम्यान, मृतकांचे नातेवाईक छत्तीसगड आणि कोलकता येथे राहतात. ते इथपर्यंत येईपर्यंत मृतदेह शवागारात ठेवले आहेत.
देबाशिष रॉय (वय 40) आणि शशीकिरण टोपो (वय 32) या दोघांनी काल राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हे दोघे पती-पत्नी असल्याचे सांगितले गेले. मात्र, पोलिसांत तपासात याचे लग्नच झाले नसल्याचे समोर आले. देबाशिष कोलकता आणि शशीकिरण छत्तीसगडची रहिवासी आहे. त्यांनी निर्मल बॅंग शेअर मार्केटिंग कंपनीची शाखा अडीच वर्षापूर्वी घुग्घुस येथे सुरू केली.
सोबतच शशिकिरण शिवणकाम सुद्धा शिकवायची. कोरोना संकटाच्यापूर्वी त्यांच्या शेअर बाजारातील गुंतवणूक चांगली सुरू होती. मात्र, टाळेबंदीत तर त्यात मंदी आली. निर्मल बॅंग कंपनीत गुंतवणूक केलेल्या अनेकांची रक्कम कमी झाली. या दोघांवर कर्ज होते. ते टाळेबंदीत वाढतच गेल्याची माहिती आहे. त्यातच बुधवारी अचानक या दोघांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली. ते घुग्घुस येथील श्लोलेम गोस्पल चर्चचे मागील तीन वर्षांपासून सदस्य होते. घुग्घुस येथील साहानी कॉम्प्लेक्स फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहायचे.
त्या फ्लॅटचा मालक प्रवीण कोंकटी यांनी घटनेच्या आदल्या दिवशी देबाशिषची दुचाकी नेली होती. दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी दुपारी दुचाकी परत करण्यासाठी कोंकटीने देबाशिषच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु दोघांकडूनही उत्तर मिळाले नाही.
कोंकटीने अनेकदा या दोघांच्याही भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढून त्यांना उत्तर मिळत नव्हते. शेवटी त्याने घुग्घुस पोलिसांना याची माहिती त्यांनी दिली. दोन वाजता पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आतील दृश्य बघून तेही दाहरले.
देबाशिष आणि शशीकिरण यांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सूत्रानुसार दोन दिवसांपूर्वीच देबाशिषने घुग्घुस येथील एका हार्डवेअर दुकानातील नायलॉनची दोरी आणि फर्निचरच्या दुकानातून स्टूल विकत घेतला होता. पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात आम्ही चूक केली. परंतु मदत करायला कुणीच समोर आले नाही.
त्यामुळे हा निर्णय घेत आहे. आम्हाला माफ करा, असे लिहिले होते. त्यामुळे ती चूक नेमकी कोणती. ती चिठ्ठी त्यांनीच लिहिली आहे का? याचा तपास पोलिस करीत आहे. त्यांच्या घरातून तीन भ्रमणध्वनी जप्त केले. यातून या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात या दोघांचेही कुणीही नातेवाईक नाही. त्यांच्या नातेवाइकांना पोलिसांनी याची माहिती दिली. दोघांचेही नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदन होणार नाही. मृतदेह शवागारात ठेवले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.