भंडारा : पूर्व विदर्भात सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये लोकप्रिय असलेल्या तंबाखू-सुपारीच्या खर्ऱ्याचे व्यसन भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे शहरांपासून गावांपर्यंत सर्वत्र रस्त्यारस्त्यांवर बेरोजगारांनी टपऱ्या थाटलेल्या आहेत. मात्र, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व टपऱ्या बंद पडल्याने शौकिनांची आफत झाली. काही दिवस घरपोच मिळणारा खर्रा आता भाववाढीमुळे आणखी महागला आहे. त्यामुळे शौकिनांपैकी अनेकांनी घरीच तंबाखू-सुपारी घोटण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यात लागणारे साहित्य दुकानांतून पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने व्यसनासाठी ओढाताण सहन करावी लागत आहे.
पूर्वीच्या काळी आरोग्यदायी व सामाजिक प्रतिष्ठेचा दर्जा मिळवून देणारे पान खाण्याचे व्यसन कधीचेच कालबाह्य झाले आहे. त्याची जागा आजच्या काळात खर्ऱ्याने घेतली आहे. किशोरवयीन युवकांपासून प्रौढ व वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती या व्यसनात गुरफटल्या आहेत. साधा तंबाखू व सुगंधी तंबाखू वापरून बनविण्यात येणारा खर्रा भाववाढीमुळे 20 ते 25 रुपयांपर्यंत मिळत होता. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व टपऱ्या बंद पडल्याने शौकिनांची अडचण झाली. त्यानंतर किराणा दुकानांत तंबाखू, सुपारी व इतर साहित्याची टंचाई झाल्याने पुन्हा भाववाढ झाली. आता लपूनछपून खर्रा मिळवल्यास 30 ते 35 रुपये मोजावे लागतात. त्यातही येता-जाता पोलिसांची नजर चुकविण्याची वेळ येते. त्यापेक्षा आपल्या घरीच तंबाखू-सुपारी घोटून तलफ भागविण्याची वेळ आली आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे खर्रा शौकिनांना ओढाताण सहन करावी लागत आहे.
चोरी चोरी चुपके चुपके
टपऱ्या बंद असल्या तरी नेहमीच्या ग्राहकांसाठी संबंधितांनी खर्रा पुरविण्याची तयारी ठेवली आहे. दुकानाच्या जवळपास सकाळी व सायंकाळी उभ्या असलेल्या टपरी मालकाकडे मागणी केल्यास खर्रा मिळतो. परंतु, सुपारी व तंबाखूच्या वाढलेल्या किमती व पुरवठ्याअभावी झालेली टंचाई यामुळे खर्रा सतत महाग होत आहे. शिवाय नेहमी वेळेवर तयार खर्रा मिळण्याचीही हमी नाही. एकापेक्षा अधिक खर्रा खाणाऱ्याला कमाई नसताना दिवसाकाठी 80 ते 100 रुपये खर्च करणे कठीण होत आहे.
रोजगार गेल्याची चिंता
भंडारा शहरात शेकडो पानटपऱ्या व चहाची दुकाने आहेत. यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांना लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यातही कुटुंबात कमावता एकच असून खाणाऱ्यांची संख्या चार ते पाच आहे. त्यामुळे या टपरीवाल्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाचे लॉकडाऊन लवकरात लवकर संपले तर, नेहमीसारखा व्यवसाय करता येईल, असे मत एका टपरी मालकाने व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.