यवतमाळ : जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होऊ घातले आहे. त्यासाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आलेत. गेल्या आठ दिवसांत आठ हजार 141 जागांसाठी अर्जांचा पाऊस पडला. गावकारभारी होण्यासाठी तब्बल 20 हजार 546 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 461 व ऑगस्ट-सप्टेंबर व ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत मुदत संपणाऱ्या 980 ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात येत आहे. गेल्या मंगळवारी (ता.15) निवडणुकीची नोटीस तहसीलस्तरावर प्रसिद्घ करण्यात आली. गेल्या 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. उमेदवारांना आधी ऑनलाइन अर्ज भरावा लागला. त्यानंतर तो अर्ज संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्यात आला.
सोमवारपासून (ता.28) सर्व्हर डाऊन झाले होते. परिणामी निवडणूक आयोगानेअखेरच्या दिवशी ऑफलाइन नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास मंजुरी दिली. त्यामुळे तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी दिसून आली. पहिल्या टप्प्यात 461 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यावेळी अनेकांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, यावेळी प्रक्रिया आयोगाने रद्द करून नव्याने कार्यक्रम जाहीर केला.
या टप्प्यात ज्या उमेदवारांनी आधीच अनामत रक्कम भरली आहे. अशांना पुन्हा रक्कम भरावी लागली नाही. मात्र, यासाठी पावतीची प्रत त्यांना दाखवावी लागली. बुधवार (ता.31) अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी ऑनलाइन 736 नामांकन दाखल झाले होते. त्यातील कवेळ 15 अर्ज तहसील कार्यालयात आले.
त्यानंतर हळूहळू अर्ज येण्याची गर्दी वाढली. नामाकंन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 11 हजार 814 नामनिर्देशनपत्र दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यात आठ हजार 141 ग्रामपंचायतींच्या जागेसाठी 20 हजार 546 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. त्यामुळे गावपुढारी होण्यासाठी गावात राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.