अमरावती : मिशन बिगेन अगेन अंतर्गत सुरू झालेल्या भाजीबाजारात भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. लॉकडाउनमध्ये पडत्या भावात विकल्या गेलेल्या भाज्या किरकोळ बाजारात मात्र अव्वाच्या सव्वा भावात विकल्या जात आहेत. थोक बाजारातच दर वधारल्याने भाव वाढले, असे किरकोळ विक्रेत्यांनी म्हटले आहे. टोमॅटो, फ्लॉवर, पालक, गवार, कोथींबिर यांचे भाव चांगलेच वाढले आहेत.
अनलॉक झाल्यानंतर सम-विषम पद्धतीने भाजी व फळबाजार सुरू झाला आहे. एरवी दर गुरुवारी बंद राहणारा भाजीबाजार या गुरुवारी (ता.11) सुरू होता. बाजारात 77 टेम्पो व सात ट्रक भाजीपाल्याची आवक नोंदविल्या गेली. बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक झाली आहे. लॉकडाउनमध्ये ज्या भाज्यांची विक्री होत नव्हती, बाजार मिळत नव्हता अशी तक्रार होती. जो भाजीपाला उत्पादकांनी फेकला त्याच भाजीपाल्याचे दर आता चांगलेच वधारले आहेत.
फ्लावर थोक बाजारात चाळीस रुपये किलो दराने विकल्या गेल्याने किरकोळ बाजारात ती साठ रुपयांचा भाव खाऊन गेली. टोमॅटोला ग्राहक नव्हते आता तोच टोमॅटो थोक बाजारात 30 रुपये किलो, मेथी 40 रुपये, बरबटी 32 रुपये तर कोथींबिर 40 रुपये किलोने विकल्या गेली. सर्वात स्वस्त कोहळ विकल्या गेले, त्याला फक्त आठ रुपये किलो भाव आहे.
लॉकडाउनमध्ये भाजीबाजार बंद करण्यात आला, त्यावेळी महापालिकेने थेट शेतकरी ते ग्राहक, अशी योजना लागू केली. त्या कालावधीतही या भाज्यांना आजचा भाव नव्हता. अनलॉक होताच बाजारातील आवक वाढली व सोबतच भावही वधारलेत. समविषम पद्धतीचा हा परिणाम असल्याचे कारण अडते व दलाल सांगत असले तरी लॉकडाउनमध्ये दलाली संपली होती आणि शेतकऱ्यांनी स्वतः ठरविलेल्या भावात भाजी विकल्याने ती अनलॉक कालावधीच्या काळात स्वस्त मिळाली, असे ग्राहकांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.