पवनी (जि. भंडारा) : हल्ली माणसे आपल्याच चाकोरीत जगत आहेत. स्वत:साठी प्रत्येक जण जगतो, धडपडतो. मात्र, इतरांचे दु:ख पाहून ज्याचे मन द्रवित होते, डोळ्याच्या कडा पाणावतात, अशी माणसे विरळच आहेत. भौतिक श्रीमंतीपेक्षा मनाची उदारता त्यासाठी हवी असते. पवनी शहरात मयूर रेवतकर नावाचा तरुण सध्या अनेक मनोरुग्ण, निराधार व्यक्तींसाठी अन्नदाता ठरला आहे.
अत्यंत निष्काम भावनेने हे सेवाव्रत स्वीकारणाऱ्या या तरुणाला पाहून "जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुलें, तो ची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' या संत तुकारामांच्या अभंगाचा प्रत्यय येतो.
मयूर रेवतकर यांचे भोजनालय व हॉटेलचा व्यवसाय आहे. तसेच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.
शहरात अनेक वेडसर व मानसिक स्थिती बरी नसणारे व्यक्ती भटकंती करत असतात. रस्त्यावर पडलेले, टाकून दिलेले शिळेपाके अन्न खाऊन आपली भूक भागविताना एक वेडसर व्यक्ती त्यांना दिसला. हा प्रसंग पाहून मयूरचे मन हेलावले. आपण शक्य ती मदत करून अशा लोकांची क्षुधा भागविण्याचा निर्धार त्यांनी केला. तेव्हापासून त्यांनी दररोज आपल्या भोजनालयातून भटक्या, निराधार व मनोरुग्ण लोकांना अन्नपदार्थ द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सायंकाळी त्यांच्या हॉटेलसमोर अशा लोकांचा गोतावळा असतो. त्यांची क्षुधा शांत करून आपल्या मनाला समाधान मिळत असल्याचे मयूर सांगतो.
शहरात सध्या 10 ते 15 जण विमनस्क अवस्थेत वावरताना दिसतात. केस, दाढी वाढलेले, मळलेले कपडे अशा स्थितीत असणाऱ्यांच्या दूर राहणेच लोक पसंत करतात. परंतु, मयूरने त्यांच्यामध्ये माणूसपण शोधले आहे. समाजाने दुरावलेल्या, अव्हेरलेल्या या लोकांची भूक शमविण्यासाठी तो त्यांना भोजनालयातून जेवण देतो.
मंगळवारी त्यांच्या भोजनालयात दोन मनोरुग्ण व्यक्ती आले. त्यांची स्थिती पाहून
मयूरची सेवावृत्ती जागृत झाली. मित्र मंगेश भोयर यांच्या मदतीने त्यांनी न्हावी बोलावून मनोरुग्णाची दाढी व कटिंग करून घेतली. अंघोळ घालून स्वच्छ कपडे घालायला दिले. काही वेळापूर्वी किळसवाण्या रूपात असलेल्या त्या व्यक्तींचे बाह्यरंग पालटले होते. यापूर्वीसुद्धा त्यांनी असे कार्य केले आहे. प्रसंगी त्यांना मनोरुग्ण व वेडसर व्यक्तींच्या शिव्या, संतापालाही सामोरे जावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही. बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे, हॉटेलमधून मुक्या जनावरांना खायला देणे अशी कामे मयूर मित्रांच्या सहकार्याने करतो.
वडिलांचा वारसा जपला
प्रत्येक जण समाजासाठी काहीतरी देणे लागतो. मला या कार्याची प्रेरणा घरातूनच मिळाली. आजोबा रामचंद्र रेवतकर भुकेल्यांना जेवण द्यायचे. माझ्या वडिलांनीसुद्धा ही परंपरा जोपासली. हाच वारसा मी जपला आहे.
- मयूर रेवतकर
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.