आळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.
चौधर यांनी सांगितले, की मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड वाहनांना आळंदी शहरातून शुक्रवारपासून प्रवेश बंदी केली आहे. भोसरी, तसेच चाकणहून मरकळ औद्योगिक विभागात जाणारी अवजड वाहने पुणे-नगर रस्त्यावरून वाघोली-लोणीकंदमार्गे मरकळला वळविण्यात येतील. पुण्यावरून येणारी छोटी चारचाकी वाहने चऱ्होली खुर्द ते चऱ्होली बुद्रुक बाह्यवळण मार्गाने वळविली जातील. शहरात रस्त्यातील अडथळे, अतिक्रमणे दूर करण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक वारी काळात राहील.
हातगाड्या, तसेच फिरत्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. वारी काळात रस्त्यावर, तसेच धर्मशाळांसमोर उभ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. महाद्वारातील रस्त्यांवरही वाहनांना बंदी राहील. आळंदी पोलिसांच्या वतीने नऊ सहायक पोलिस आयुक्त, ४३ पोलिस निरीक्षक, १७० सहायक पोलिस निरीक्षक, ११३० महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, दोनशे वाहतूक पोलिस, ५५० गृहरक्षक दर्जाचे कर्मचारी, असा बंदोबस्त आहे. प्रस्थान (ता. २५) झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. २६) पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. दिंडीतील काही वाहने माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होण्याआधी पहाटे दोनपासून पुणे-आळंदी रस्ता, चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द बाह्यवळण आणि केळगाव- डुडूळगाव रस्त्याने पहाटे पाचपर्यंत सोडण्यात येतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.