शुद्ध विमा अर्थात "टर्म इन्शुरन्स'

Life-Insurance
Life-Insurance

आर्थिक नियोजनात बचत, गुंतवणुकीइतकेच महत्त्व विम्याचे आहे. किंबहुना आर्थिक नियोजनाची सुरूवात ही विम्यानेच झाली पाहिजे. विम्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे आयुर्विमा आणि दुसरा आरोग्य विमा. यातील आयुर्विमा हा आपण लक्षात घेणार आहोत. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आयुर्विमा हा खूप महत्त्वाचा आहे. त्यातही आयुर्विम्याअंतर्गत विविध पॉलिसी विकल्या जातात. मात्र टर्म इन्श्युरन्स हाच खऱ्या अर्थाने आयुर्विमा आहे. कारण यात तुम्हाला कमी प्रिमियममध्ये मोठे विमा संरक्षण मिळते आणि तोच आयुर्विम्याचा मुख्य उद्देश आहे. 

टर्म इन्श्युरन्स घेताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहूया. कारण बहुतांश वेळा अनेकांना ज्या कारणासाठी "विमा' घ्यायचा, त्या मूळ कारणाचा विसर पडलेला दिसतो. आपण घेतलेल्या पॉलिसीचा प्रकार काय आहे, त्यात जोखीम संरक्षण किती आहे, याचा अनेकांना पत्ता नसतो व फक्त आपण "अमुक एवढा' हप्ता भरतो, इतकेच ते सांगू शकतात. 

विमा पॉलिसी घेण्यापूर्वी लक्षात घ्यायचे मुद्दे -
आयुर्विम्याची कोणतीही पॉलिसी घेण्यापूर्वी पुढील प्रश्‍नांची उत्तरे आपण दिल्यास आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल. 

१) आयुर्विमा कोणी घ्यावा 
साधारणपणे ज्या व्यक्तींवर आर्थिकदृष्ट्या जर कोणी अवलंबून नसेल तर अशा व्यक्तींना आयुर्विम्याची फारशी गरज नसते. 

२) किती रकमेचा असावा किंवा जोखीम संरक्षण किती असावे
ज्या व्यक्तीचा विमा उतरावयाचा आहे, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची भविष्यकाळाची आर्थिक गरज किती रकमेची असणार आहे, यावर विमा संरक्षणाची रक्कम किती असावी हे ठरवावे लागते. तसे करताना किती वर्षांकरिता हे संरक्षण हवे आहे, त्यानुसार त्या कालावधीतील गरजा कमी-जास्त होऊ शकतात. ही रक्कम जेवढी असेल, त्या रकमेचे आजचे निव्वळ मूल्य किती असेल तेवढेच विमा संरक्षण घ्यावे.

सर्वसाधारणपणे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १२ पट विमा संरक्षण घेणे योग्य ठरते. मात्र गरजेनुरूप किंवा कौटुंबिक आवश्यकतांनुसार आणि जोखमीनुसार ही रक्कम अधिकसुद्धा असू शकते.

3) नेमकी कोणती पॉलिसी घ्यावी 
ज्या पॉलिसीमध्ये अपेक्षित जोखीम संरक्षण कमीत कमी हप्ता भरून होईल ती पॉलिसी घेतली पाहिजे. ही सुविधा टर्म इन्श्युरन्समध्ये मिळते. म्हणूनच आयुर्विमा घेताना तो टर्म इन्श्युरन्सच असला पाहिजे. यात विम्याचा हफ्ता तुलनेने कमी आणि मिळणारे विमा संरक्षण जास्त असते. लक्षात ठेवा विमा हा गुंतवणुकीसाठी नव्हे तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी घ्यायचा असतो.  

४) टर्म इन्शुरन्स म्हणजे काय 
या प्रकारात ग्राहक पॉलिसीच्या मुदतीमध्ये विम्याचे हप्ते भरून संरक्षण मिळवतो. या कालावधीत ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जोखीम रक्कम मिळते; मात्र विम्याच्या मुदतीनंतर जर ग्राहक हयात असल्यास कुठलीही रक्कम परत मिळत नाही. सर्वसाधारण विम्यामध्ये (जनरल इन्शुरन्स) हीच संकल्पना असते. परंतु दुर्दैवाने बहुतेकांना हे माहितच नसते.

५) आयुर्विमा ही गुंतवणूक आहे, असे मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे, त्यामुळे आणि "टर्म इन्शुरन्स'ची माहितीच नसल्याने बहुतेकांचा ओढा विम्यातून लाभ मिळण्याकडे असतो. 
गृहकर्ज वा अन्य कर्ज देणाऱ्या कंपन्या कर्जदारासाठी या "टर्म इन्शुरन्स'ची पॉलिसी नक्कीच देतात, ज्यायोगे कर्जाच्या रकमेच्या परतफेडीची तरतूद कर्जदाराच्या अकाली मृत्यू झाल्यासही होऊ शकते. 

६) प्राप्तिकर बचतीसाठी विमा नको  
"विमा' हे जोखीम संरक्षणासाठीचे प्रभावी हत्यार आहे. "प्राप्तिकर बचत' अथवा गुंतवणुकीसाठी ते अगदी बोथट असते. त्यासाठी इतर अनेक योग्य पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. विमा हे प्राप्तिकर बचतीचे साधन नव्हे. प्राप्तिकर बचत हा त्याचा एक अतिरिक्त लाभ आहे हे सर्वात महत्त्वाचे. निव्वळ जोखीम रकमेसाठीच आयुर्विमा घेतला पाहिजे.

७) पॉलिसी खरेदीचा पुनर्विचार 
तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यावर अशी पॉलिसी तुम्हाला मिळाल्यापासून 15 दिवसांत तुम्ही ती कुठल्याही कारणाने रद्द करू शकता. या 15 दिवसांच्या "फ्री लूक पीरियड'मध्ये पॉलिसी रद्द करून तुम्ही भरलेला हप्ता (खर्च वजा करून) तुम्हाला परत मिळतो. 

८) सल्लागाराची मदत 
तुमच्या अर्थनियोजनातच विम्याचा समावेश असणे चांगले असते. आयुष्याच्या टप्प्यांवर होणारे बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य ते नियोजन करण्याकरिता चांगल्या सल्लागाराची मदत घ्या. कोणाच्याही तोंडी आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवू नका आणि विमा कंपनीच्या अधिकृत पत्रकातीलच माहिती विचारात घ्या. तसेच विम्याच्या पॉलिसीचा अर्ज स्वतः भरणे योग्य असते, पॉलिसी आल्यानंतर निदान त्यातील महत्त्वाच्या बाबी काय आहेत हे तपासून बघावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com