-- अमित अरुण उजागरे
भावांनो......या शब्दात जो बंधुभाव दडलाय ना....त्याला खरंतर पर्याय नाही. हो खरंच पर्याय नाही!! मी असं काय म्हणतोय हे तुम्हाला लवकरच कळेल. त्यासाठीच हा लिखाणाचा प्रपंच! तर 'आत्मपॅम्फ्लेट' नावाचा नवा मराठी सिनेमा आलाय.... असा शब्द तुम्ही कधी ऐकलाच नसेल...कारण तो लेखक-दिग्दर्शकानंचं तयार केलाय.....खरंतर ९० च्या दशकातील सामाजिक-राजकीय समाजाचं हे 'दर्शन' आहे. हिंदीतली फिलोसॉफी या अर्थानंही हे घेता येईल. 'प्रेमाचा धागा'च जन्मापासून मृत्यूपर्यंत सदासर्वकाळ तुमच्यासोबत आहे, हे ठासून सांगणारा 'आत्मपॅम्फ्लेट' हा सिनेमा! (Aatmpamphlet Marathi Movie review Paresh Mokashi Ashish Bende)
सुजय डहाकेचा 'शाळा' सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल....तसाच काहीसा हा सिनेमाही तुम्हाला फील देतो....पण त्याची ट्रिटमेंट भन्नाट आहे.....कथा-पटकथा परेश मोकांशींची! 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी', 'चि व चिसौका' हे परेश मोकांशीचे सिनेमे. याप्रमाणेच त्यांचा नावा सिनेमा 'आत्मपॅम्फ्लेट' कसा असेल याचा अंदाजही तुम्हाला बांधता येणार नाही. परेश मोकाशींसारख्या दर्जेदार आणि सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या लेखकाच्या लेखणीतून 'आत्मपॅम्फ्लेट' साकारलाय. पण ही नौका पैलतीर नेलीए ती आशिष बेंडे या व्यक्तीनं. याच व्यक्तीची ही आत्मकथा, त्यानंच याचं दिग्दर्शनही केलंय....कसं ते सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलच.
९०च्या दशकात जन्म घेतलेले लोक खूपच भाग्यवान आहेत, असं म्हटलं जातं. एखाद्यानं विशिष्ट काळात अवतार घ्यावा तसे हे लोक. हो कारण ९०च्या दशकात भारतात जन्म घेणं म्हणजे अनेक मोठ्या बदलांच्या काळात जन्माला आल्यासारखं आहे, जे शब्दशः खरंही आहे. कारण याच काळात भारतात ज्या काही सामाजिक, सांस्कृतीक आणि राजकीय घडामोडी घडल्या त्या सर्वांचं प्रतिबिंब 'आत्मपॅम्फ्लेट'मध्ये आहे. या सिनेमातला नायक एका अशा समाजाचं प्रतिनिधीत्व करतो ज्या सामाजात अनेक गोष्टी बदलांवर स्वार झालेल्या आहेत. यातील वैचारिक बदलांची घुसळणं रस्त्यावरुन जाणाऱ्या पाण्याच्या टँकरमधून पाणी उसळावं अगदी तशीच आहे. त्याचं हे चित्रण आपल्याला हसण्यावारी घेण्याऐवजी अंतर्मुख व्हायला भाग पाडतं.
आज याच नव्वदीत जन्मलेले अनेकजण असं म्हणताना आपण पाहिले असतील की, आमच्या वेळेस शाळेतले विविध जातीधर्मांचे मित्र गुण्यागोविंदानं राहत होतो. जात-धर्म अस्तित्वात असले तरी आजच्यासारखी टोकाच्या द्वेषाची परिस्थिती त्यावेळी नव्हती. त्यावेळी बदलाच्या काही ठिणग्या पडाल्या, त्यांनी पेटही घेतला पण मनभेद इतक्या टोकाला गेले नाहीत....
एखादा अवतारी पुरुषाप्रमाणं या सिनेमातील नायकाच्या जीवनात विशिष्ट दिवशी देशात सामाजिक-राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडतात....मग जनता पक्षाचं सरकार पडल्याची असो, व्हीपी सिंगांचं सरकार आल्याची असो, 'मंदिर वही बनाएंगे'च्या घोषणा असोत, बाबरी पाडल्याची घटना असो, ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी ते आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन असो....हे नायकानं सिनेमात अनुभवलं....पण ही त्या प्रत्येकाची कहाणी आहे ज्यानं ९० च्या दशकांत जन्म घेतलाय.
या सर्व घटना सिनेमात बिटविन दि लाईन्स समजून घ्याव्या लागतात कारण तुम्ही ९०च्या कालखंडानंतर जन्मला असाल तर त्या पडद्यावर पाहताना तुम्हाला आजिबात गंभीर वाटणार नाहीत.... उलट तुम्ही त्या त्या प्रसंगात इतके समरसून जालं, हे सहज सोडून द्यालं आणि केवळ निखळं एन्टरटेन्मेंटचा आनंद घ्यालं. म्हणजेच हा सिनेमा तुम्हाला ढीगभर गंभीर संदर्भ देऊनही तुमचं उत्तमरित्या मनोरंजनही करतो.
प्रेम करायचं पण ते व्यक्त करण्याची हिंमत नसलेल्या या जमान्यातल्या नायकाला इयत्ता ४ थीत असताना झालेलं प्रेम.... पुढे हायस्कूल आणि नंतर कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर तरी मिळतं का? पुढे त्याच काय होतं? हा या कथित आत्मचरित्राचा प्रवास प्रत्यक्ष पडद्यावर पाहणं जास्त रंजक आहे. वर्तमानपत्रातून किंवा रस्त्यावर कोणीतरी वाटलेलं पॅम्फ्लेट आपल्या हातात पडल्यानंतर त्याची रचना, मजकूर आपल्याला नेमक्या गोष्टी सांगून जातं. तसंच या सिनेमांचं पोस्टरही क्रिएटिव्ह आहे.
या ब्रह्मांडातल्या छोट्याशा पृथ्वी नामक ग्रहावरील आपण खुजे लोक आहोत...इथल्या जात-धर्मापलिकडं भविष्याचा वेध घेतानाचा एक खास विचारही तुम्हाला सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये दिसून येतो. त्यासाठी हा सिनेमा तुम्हाला थिएटरला जाऊन पाहावा लागेल. कारण एक उत्कृष्ट दर्जाचा सिनेमा मार्केटिंग अभावी असाच आला आणि असाच गेला असं व्हायला नको....
amit.ujagare@gmail.com
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.