

likhita japa
esakal
- राजेन्द्र खेर
नामजप-साधना करण्याचे साधारणतः तीन प्रमुख हेतू असतात. पहिला, साधकाला मनःशांती हवी असते, दुसरा हेतू आपल्या पदरी पुण्य पडावं; तर तिसरा आत्मज्ञान व्हावं हा हेतू असतो. आत्मज्ञान होण्याचा हेतू हा नक्कीच श्रेष्ठ मानला पाहिजे. नाम कसंही घ्या; ते देवापर्यंत पोहोचतं, अशीही आपली श्रद्धा असते. त्यामुळे अनेक श्रद्धावान लोक ध्यान करतात आणि जोडीला नामजपही करतात.
पण या क्रिया करताना काही अडचणी मात्र येतच असतात. प्रमुख अडचण म्हणजे, ध्यानाला बसल्यानंतर एकाच ठिकाणी मन स्थिर होण्याऐवजी अनेक विषय किंबहुना नको ते विषय मनात उफाळून येतात, दृष्टीसमोर दिसू लागतात. मग ध्यानातील सहजता जाऊन बळानं मनाला केंद्रित करायचा प्रयत्न होतो. अशा वेळी मनात उफाळून येणाऱ्या विषयांना येऊ द्यायचं असतं; त्यांचा निचरा होऊ द्यायचा असतो. मनात साठलेला कचरा, ज्याला भगवान गीतेत 'शोक' म्हणतात तो जायला वेळ लागतो. सातत्य आणि निदिध्यासानं ते साध्य होतं.
डोळे मिटून नामजप करतानाही अनेकांना हाच अनुभव मिळत असतो. मुखानं नाम घेतलं जातं आणि मन कुठेतरी भरकट राहतं. ज्या देवाचं नाम घेतो त्याच्यापाशी मनाला पुन्हा पुन्हा आणावं लागतं. अर्जुन गीतेत म्हणतो, भगवंता, मी पृथ्वीचं राज्य जिंकून तुझ्या पायाशी आणीन; पण मनाला एका ठिकाणी स्थिर करणं खूप कठीण आहे ! ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, 'देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या.' सतत हरिनाम घेण्यातून आत्मसाक्षात्कार होण्याच्या चारही मुक्ती साध्य होत असतात.