प्रबोधनाच्या वाटा तुडविताना मागील 27 वर्षांपूर्वीचा भावनेनं कवटाळणारा समाज, अविचारानं बेभान होणारा तरुण आणि आता 27 वर्षांनंतर महापुरुषांच्या विचारांना कवटाळून तरुण मार्गक्रमण करत आहे.
Phule-Shahu-Ambedkar Vichar Sammelan, Nipani : गेली 27 वर्षे कर्नाटकातील निपाणी तालुक्यासह परिसरात महापुरुषांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करत 'डॉ. आंबेडकर विचार मंच' (Dr. Ambedkar Vichar Manch, Nipani) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दाखवलेल्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहे.
प्रबोधनाच्या या वाटा तुडविताना मागील 27 वर्षांपूर्वीचा भावनेनं कवटाळणारा समाज, अविचारानं बेभान होणारा तरुण आणि आता 27 वर्षांनंतर महापुरुषांच्या विचारांना कवटाळून तरुण मार्गक्रमण करत आहे. कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये महापुरुषांच्या विचारांचं संक्रमण किती परिणामकारक असतं, त्याचं ज्वलंत उदाहरण निपाणी तालुक्यात अनुभवायला मिळेल.
'डॉक्टर आंबेडकर विचार मंच'च्या माध्यमातून समाजाला सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या गतीमान कसं करता येईल, यासाठी अखंड 27 वर्षे 'फुले-शाहू-आंबेडकर विचार संमेलना'च्या (Phule-Shahu-Ambedkar Vichar Manch) माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक अभ्यासू विचारवंतांना व्याख्यानमालेसाठी निपाणीत आणून महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जात आहे. जात, धर्म, पंथ भाषाभेद या पलीकडं जाऊन समाजाला गतीमान करण्याचं काम डॉ. आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून निरंतर सुरु आहे.
आज खऱ्या अर्थानं या विचार संमेलनाच्या माध्यमातून तयार होणारा तरुण स्वतःच्या कुटुंबाचं, समाजाचं एक नैतिक मूल्य जपण्याचं काम करत आहे. समाजातील शोषित, वंचित, पीडित, कामगार, कष्टकरी, शेतकरी देवदासी, विधवा, परितक्त्या स्त्रिया यासह बहुजन समाजातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या समाज व्यवस्थेला संघटनेच्या माध्यमातून ऊर्जा देण्याचं काम आम्ही करीत आहोत.
याच माध्यमातून वारांगणेपासून ते दुर्लक्षित समाजातील गरजू, होतकरू लोकांच्या हित कल्याणासाठी धावून जाणारी तरुण पिढी घडण्याचा सातत्यानं प्रयत्न आहे. आज संमेलनाच्या माध्यमातून भणंगपणे फिरणाऱ्या तरुणांपेक्षा स्वाभिमानी बाणा जपून कार्यकर्तृत्व निर्माण करणारा तरुण स्वाभिमानानं, ताठमानेनं जगताना दिसत आहे. एकीकडं तरुणाई व्यसनेच्या आहारी, गुन्हेगारी प्रवृत्तीकडं जात असतानाच काही समाजभान जपणारी तरुणाई स्वतःच्या कुटुंबाकडं आणि समाजाकडं सामाजिक जबाबदारी म्हणून पाहत आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे सगळं करत असतानाच तरुणांमध्ये महापुरुषांच्या विचारांचा जोश देखील तितकाच पहायला मिळत आहे. आज प्रत्येक संमेलन तरुणांच्या पुढाकाराने आणि विचाराने यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे. निपाणी तालुक्यातली परिवर्तनवादी चळवळ गतीमान होताना दिसत आहे. विविध समाजातील प्रतिनिधी, लोकांचा मोठा सहभाग या डॉ. आंबेडकर विचार मंचच्या संमेलनात सातत्यानं दिसून येत आहे.
सुरुवातीच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोळकर, काॅम्रेड गोविंद पानसरे, बाबा आढाव, आ. ह. साळुंखे, हरी नरके, पार्थ पोळके, लक्ष्मण माने, विश्वंभर चौधरी, श्रीपाल सबनीस, प्रतिमा परदेशी, अमोल मिटकरी, यशवंत गोसावी, नितीन बानगुडे-पाटील, वसंत हंकारे, डॉ. राजेंद्र कुंभार, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, गणेश शिंदेंसह कवी नितीन चंदनशिवे अशा अनेक अभ्यासू व दिग्गजांच्या माध्यमातून आणि विद्रोही साहित्य संमेलनातून समाज मनाला समतावादी दृष्टी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजतागायत करीत आहोत.
आजही या संमेलनात बहुजन समाजातील लोकप्रतिनिधी, सर्व स्तरातील जनमाणसं सक्रिय आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत. यातून समाजाला विचारांची समतावादी दृष्टी देण्याची भूक आम्ही भागवण्याचं काम करीत आहोत. समाजाला सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या समतोल ठेवून परिवर्तनवादी चळवळ गतीमान करीत आहोत. याचंच खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान वाटत आहे. येणाऱ्या पिढीनं देखील या विचारधारेची कास धरून मानवी जीवन सुख समृद्ध करतील, अशी आशा आहे.! 'अन्यायाविरूद्ध लढणाची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आपण समाजामध्ये पोहोचवणे तितकेच गरजेचे आहे.
-प्रा. सुरेश कांबळे, संस्थापक-अध्यक्ष डॉ. आंबेडकर विचार मंच, निपाणी (कर्नाटक राज्य)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.