Ayodhya Verdict : 'न्यू इंडिया' साकारण्याची जबाबदारी प्रत्येकावर : पंतप्रधान

PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi

नवी दिल्ली : राममंदिर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने देशात नवी पहाट उजाडली असून, 'विविधतेत एकता' या भारताच्या प्राणतत्त्वाचे दर्शन घडविणारा हा निकाल आहे. मंदिर निर्माणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, आता राष्ट्र निर्माणाची जबाबदारी प्रत्येकावर आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निकालावर जनतेला 'न्यू इंडिया' साकारण्याचे आवाहन केले. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनापासून स्वागत केले. आजचा दिवस पुढे जाण्याचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 'आजच्या निकालाने भारतीय लोकशाही किती मजबूत आहे, हे जगाला कळाले. ज्या प्रकारे सर्व समुदायांनी मोकळेपणाने निकाल मान्य केला, ते भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविणारे आहे.

विविधतेत एकता यासाठी भारत ओळखला जातो. हा मूलमंत्र बहरला असल्याचे दिसते. ज्याला हे प्राणतत्त्व समजून घ्यायचे असेल, तो आजच्या घटनेचा उल्लेख नक्कीच करेल,' असे मोदी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे दृढ इच्छाशक्तीचे दर्शन घडवले. यासाठी सर्व न्यायाधीश, न्यायालये आणि न्यायपालिका विशेषत्वाने अभिनंदनास पात्र आहेत, असेही ते म्हणाले. 

मोदी म्हणाले, नव्या भारतात कटुता, नकारात्मकतेला स्थान नाही. कठीण गोष्टीवर तोडगा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत निघू शकतो, हे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने नवी पहाट उगवली आहे. अयोध्यावादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला असेल. आता निकालानंतर नवी पिढी नवभारताच्या निर्माणासाठी झटेल. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचा विकास करताना विश्‍वास जिंकून पुढे जायचे आहे. मंदिर निर्माणाचा निर्णय न्यायालयाने दिला. आता प्रत्येक नागरिकावर राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी वाढली आहे. नागरिक म्हणून प्रत्येकाला न्यायिक प्रक्रियेचे पालन करणे, नियम, कायद्याच्या पालनाचे दायित्व वाढले आहे, असेही मोदी म्हणाले. 

कटुतेला तिलांजली देण्याचा दिवस 

पंतप्रधान मोदींनी नऊ नोव्हेंबर या दिनविशेषाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, की आजच्याच तारखेला बर्लिनची भिंत पाडली गेली आणि दोन विरोधी प्रवाह एकत्र आले. आजच कर्तारपूर कॉरिडॉरला प्रारंभ झाला असून, यात भारत-पाकिस्तानचा सहभाग आहे.

आजचा निकाल पाहता नऊ नोव्हेंबर ही तारीख आपल्याला पुढे जाण्याची शिकवण देणारी आहे. आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि एकत्रितपणे पुढे जाण्याचा आहे. कोणाच्या मनात कटुता राहिली असेल तर त्याला आज तिलांजली देण्याचाही दिवस आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com