प्रदूषणावर अरविंद केजरीवालांचे पुन्हा 'सम-विषम गणित'

CM-Arvind-Kejriwal
CM-Arvind-Kejriwal

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेला 'सम- विषम' योजनेचा आधार दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने पुन्हा एकदा घेतला आहे. दिल्लीतील हवाप्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी 4 ते 15 नोव्हेंबर या काळात 'ऑड-इव्हन' (सम-विषम) चा प्रयोग राबविण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (ता.13) दिली. 

पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, "प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त असल्याचे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. 4 ते 15 नोव्हेंबर या काळात 'सम- विषम' योजना राबविणार आहे. या योजनेमुळे प्रदूषणात घट झाल्याचे यापूर्वी झालेल्या अभ्यासात दिसले आहे. 'सम- विषम' ही तात्कालिक उपाययोजना आहे. ती दीर्घकाळ राबवू शकत नाही. याची आणखी माहिती काही दिवसांतच जाहीर करण्यात यईल.'' 

नोव्हेंबर महिन्यात पिकांच्या काढणीनंतर शेतातील तूस जाळण्याची पद्धत आहे. याच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात आणखी भर पडते. यासाठी शेजारील हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांबरोबर सहकार्य करीत या पद्धतीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत वाहनांसाठी 'सम- विषम'चा नियम 'आप' सरकारने याआधी दोन वेळा लागू केला होता. या नियमानुसार सम-विषम तारखेनुसार गाड्या दिल्लीतील रस्त्यावर येणार आहेत. 

सात कलमी कार्यक्रम :
नोव्हेंबरमध्ये सुगीच्या काळात हवेच्या प्रदूषणाची पातळी उच्चांकी पातळीवर पोचते, हा अनुभव लक्षात घेऊन दिल्ली सरकारने सात कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील काही ठळक मुद्दे. 
- दिल्लीत 4 ते 15 नोव्हेंबर या काळात 'सम-विषम' नियम 
- शुद्ध हवेसाठी वृक्षारोपण कार्यक्रमास प्रोत्साहन 
- वृक्षारोपण मोहिमेचे 'ट्री चॅलेंज' असे नामकरण 
- हिवाळ्यात वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक 
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाळीत कमी फटाके फोडावे 
- सर्वांनी एकत्र येऊन सण साजरा करण्यासाठी सरकार दिवाळीत लेझर शोचे आयोजन करणार 
- सरकारतर्फे नागरिकांना मास्कचे मोफत वाटप 
- पर्यावरण 'वॉर रूम' उभारणार, यात पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक तक्रारीचे निराकरण केले जाईल 

नवा मोटर वाहन कायदा लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच आहे, यामुळे नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करू लागले आहेत. तरीही जनतेच्या अडचणींत भर घालणारा नियम असेल, तर त्यावर विचार केला जाईल. 
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com