
उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यादरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नवी दिल्ली - उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यादरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंजाब, हरियानाचा काही भाग, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे गारठा वाढू शकतो.
माउंट आबूसह राजस्थानात अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. माउंट आबूत चोवीस तासात किमान तापमान अडीच अंशाने घसरून उणे २ वर पोचले आहे. याठिकाणी कमाल तापमान २३.४ अंश सेल्सिअस इतके आहे. काल सिरोहीचे किमान तापमान दोन अंशांने घसरून ७ अंशावर पोचले आणि कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस होते.
हे वाचा -मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ते कर्नाटकातला भ्रष्ट कारभार; देशविदेशातील घडामोडी एका क्लिकवर
पाटण्याचे तापमान घसरले
पश्चिम भागातून थंड वारे येत असल्याने आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने बिहारच्या सर्वच जिल्ह्यात काल दाट धुके पडले होते. त्यामुळे पाटण्यात दृश्यमानता १०० मीटर नोंदली गेली. त्याचवेळी गंगा आणि सोनच्या परिसरात दृश्यमानता ही ५० ते ७५ मीटर होती. काल सकाळच्या वेळी ऊन होते. परंतु दुपारी पाऊस आल्याने आणि वारे वेगात वाहू लागले. त्यामुळे पारा ७ अंशांपर्यंत घसरला.
हरियानात तापमान २ अंशावर
हरियानात थंडी वाढत असून काल रात्री रेवाडीत तापमान २ अंश सेल्सिअस, हिसार येथे २.२ आणि नारनौल येथे २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हिमाचलमध्ये मनालीत २.४ तर सिमला येथे ७.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होते. पंचकुला येथे ११.३, कर्नाल येथे १२.४ आणि अंबाला येथे १२.६ अंश सेल्सिअस तापमान राहिले. अनेक भागात दृश्यमानता शून्यावर पोचले होते.
हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष
पंजाबमध्ये थंडीची लाट कायम
पंजाबमध्ये ३० जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. १९९८ नंतर प्रथमच राज्याला दीर्घकाळ थंडीला सामोरे जावे लागत आहे. पुढील पाच दिवस थंडीच्या लाटेमुळे दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री तापमानात आणखी घसरण होऊ शकते. १९०१ पासून लोहडीनंतर थंडी कमी होत असल्याचा अनुभव आहे. परंतु यंदा स्थिती वेगळी आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी
दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी कायम असून काल दिल्लीत किमान तापमान ४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. थंड वाऱ्यामुळे नागरिक गारठले आहेत. त्याचवेळी १५ ते ३० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत असल्याने हवेतील दर्जा सुधारला आहे. येत्या काही दिवसांत राजधानीत आणखी पारा घसरण्याची शक्यता आहे.
हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस