बुधवारी २ हजार १०१ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंतची ही विक्रमी नोंद ठरली.
Corona Update : नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मनात धडकी भरवणारी आणि सर्वसामान्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांची काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. नव्या रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. देशात बुधवारी (ता.२१) दिवसभरात सुमारे ३ लाख १५ हजार ८०२ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. या आधी अमेरिकेत ८ जानेवारीला जगात सर्वाधिक ३ लाख ७ हजार रुग्ण आढळून आले होते.
एका दिवसात सर्वाधिक मृत्यू
कोरोना मृतांच्या आकड्यांमध्ये रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. बुधवारी २ हजार १०२ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंतची ही विक्रमी नोंद ठरली. याआधी मंगळवारी २ हजार २१ जण मृत्यू पावले होते. भारत जगात एकमेव देश ठरला आहे, जिथे सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. जगातील बाकी सर्व देशांमध्ये एक हजारपेक्षा कमी लोक कोरोनामुळे दगावत आहेत.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोचली आहे. दिवसभरात १ लाख ७८ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८४ हजार ६५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही २२ लाख ९१ हजार ४२८ वर पोचली आहे. तसेच आतापर्यंत १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २७ कोटी २७ लाख ५ हजार १०३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात १६ लाख ५१ हजार ७११ जणांची चाचणी करण्यात आली.
राज्यात काय आहे परिस्थिती?
महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. याआधी देखील राज्य सरकारने कडक नियम लागू केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर कठोर लॉकडाउन लागू होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे.
महाराष्ट्र राज्यात बुधवारी कोरोनाचे नवे ६७,४६८ रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४० लाख २७ हजार ८२७ वर पोहोचली आहे. तर ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी बरे झालेल्या ५४ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही ६ लाख ९५ हजार ७४७ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.१५ टक्के झाले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. बेड्स, औषधे, ऑक्सिजन यांचा तुटवडा भासत असून कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोनाचा हाहाकार देशात असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय असावा, असा सल्ला राज्यांना दिला होता. दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत चालली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.